
झिंबाब्वे म्हणजे लिंबूटिंबू टीम, असं चित्र क्रिकेट विश्वात पाहायला मिळत होतं. मात्र स्वत: झिंबाब्वेने हे चित्र बदललं आहे. झिंबाब्वेने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाची नवी ओळख तयार केली आहे. एकेकाळी झिंबाब्वे म्हणजे तगडा संघ, अशी प्रतिमा होती. मात्र गेल्या काही वर्षात झिंबाब्वे रसातळाला गेली होती. मात्र सिकंदर रझा याने त्याच्या नेतृत्वात झिंबाब्वेला काही प्रमाणात गतवैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न केलाय. सिकंदरच्या नेतृत्वात झिंबाब्वेने पहिल्यांदाच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सुपर 8 फेरीत धडक दिलीय. इतकंच नाही तर झिंबाब्वेने पहिल्यांदाच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीत अजिंक्य राहण्याची कामगिरी करुन दाखवली.
भारत आणि श्रीलंकेत खेळवण्यात येत असलेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात झिंबाब्वे उल्लेखनीय कामगिरी केली. बी ग्रुपमध्ये असलेल्या झिंबाब्वेने साखळी फेरीत ओमानला पराभूत करत विजयी सलामी दिली. त्यानंतर झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला दणका देत 2007 नंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवला. झिंबाब्वेचा आयर्लंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाला. झिंबाब्वेने यासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला. हा सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाचं साखळी फेरीतच पॅकअप झालं.
त्यानंतर झिंबाब्वेने साखळी फेरीतील आपल्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात सहयजमान असलेल्या श्रीलंकेला धोबीपछाड दिला. झिंबाब्वेने सांघिक कामगिराच्या जोरावर हा सामना जिंकला. मात्र सिकंदरने निर्णायक क्षणी 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 45 धावांनी निर्णायक खेळी करुन श्रीलंकेविरुद्धच्या विजयात प्रमुख योगदान दिलं. सिकंदरने निर्णायक क्षणी केलेली ही वादळी खेळी झिंबाब्वेच्या विजयासाठी आणि श्रीलंकेच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली.
झिंबाब्वेच्या या विजयानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तर सिकंदरने सुपर 8 आधी वेस्ट इंडिजला थेट इशारा दिला. सिकंदरने विजयानंतर काय म्हटलं हे जाणून घेऊयात. झिंबाब्वे टीमचा सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिज, टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होणार आहे. सिकंदरने विंडीज विरूद्धच्या सामन्याआधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आम्ही हे विजयी सातत्य कायम राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सिकंदरने म्हटलं. “आम्ही आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु. आम्ही सुपर 8 मधील पहिला सामना जिंकू शकतो. आम्ही पुढचा विचार करत आहोत. मी सहकाऱ्यांना त्यांच्या मेहनतीसाठी सॅल्युट करतो. आम्ही इथवर पोहचू, असा कुणी विचारही केला असेल, असं मला नाही वाटत. त्यामुळे लोकांची मनं जिंकल्याचा आम्हाला जास्त आनंद आहे”, असं सिकंदरने नमूद केलं.