Yuzvendra Chahal : विराट कोहली बाथरुममध्ये रडत होता, नक्की काय झालेलं? चहल म्हणाला..
Yuzvendra Chahal On Virat Kohli : कुलचा जोडीतील फिरकीपटू युझवेंद्र चहल याने एका मुलाखतीत 2019 च्या वनडे कप स्पर्धेदरम्यानचा एक किस्सा सांगितला. तसेच चहलने रोहित आणि विराट या दोघांच्या नेतृत्वाबाबत भाष्य केलं.

टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. चहलने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांबाबत सांगितलं. तसेच एका सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली बाथरुममध्ये रडत होता, असा खुलासाही चहलने या पॉडकास्ट मुलाखतीत केला. भारताला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2019 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. याच सामन्यादरम्यान स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेत विराट रडला होता, असं चहलने म्हटलं. तसेच विराटच्या जवळून गेलो तेव्हाही त्याच्या डोळ्यात अश्रू होते, असंही चहलने सांगितलं.
चहलने विराटबाबत काय म्हटलं?
“मी 2019 वर्ल्ड कपमध्ये विराटला पाहिलं होतं. तो बाथरुममध्ये रडत होता. त्यानंतर मी त्याच्या जवळून जाणारा शेवटचा फलंदाज होतो. तेव्हाही विराटच्या डोळ्यात अश्रू तरळत होते”, असं चहलने राज शमामी यांच्यासोबतच्या पॉडकास्ट मुलाखतीत म्हटलं. विराटला उपांत्य फेरीत काही खास करता आलं नव्हतं. विराट त्या सामन्यात 1 धाव करुन बाद झाला होता.
उपांत्य फेरीत काय झालं होतं?
न्यूझीलंडने उपांत्य फेरीत 50 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 239 धावा केल्या होत्या. मात्र न्यूझीलंडने या धावांचा यशस्वीरित्या बचाव केला होता. न्यूझीलंडने भारताला 221 धावांवर रोखलं होतं. त्या सामन्यात ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 77 धावा केल्या होत्या. तर महेंद्रसिंह धोनी याने50 धावांचं योगदान दिलं होतं. तर टॉप ऑर्डरने घोर निराशा केली होती. त्यामुळे भारताचं अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं होतं.
रोहित आणि विराटच्या नेतृत्वाबाबत चहलने काय म्हटलं?
चहल आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात खेळला आहे. चहलने या मुलाखतीत विराट आणि रोहितच्या नेतृत्वाबाबत भाष्य केलं. चहलने या दोघांच्या नेतृत्वातील वेगळेपणाबाबत काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
“मला रोहितचा मैदानातील स्वभाव फार आवडचो. तो एक चांगला कर्णधार आहे. विराटबाबत बोलायचं झालं तर त्याच्यात दररोज तोच जोश आणि उत्साह पाहायला मिळतो”,असं चहलने नमूद केलं.
