Vinod Kambli : विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंताजनक अपडेट, काय झालंय?
Vinod Kambli Health Update : मुंबईकर, सचिन तेंडुलकरचा जिगरी आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या तब्येतीबाबत चिंताजनक अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकरचा जिगरी मित्र विनोद कांबळी (Vinod Kambli Health Update) याच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. विनोद कांबळी गेल्या अनेक वर्षांपासून तब्येतीसोबत झगडत आहेत. त्यामुळे आपला मित्र बरा व्हावा यासाठी काही महिन्यांआधी माजी खेळाडूंनी एकत्र येत कांबळीच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. तसेच राज्य सरकारनेही माजी क्रिकेटपटूला मदत केली होती. त्यानंतर कांबळीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांबळीला गंभीर आजाराचा धोका आहे. कांबळीला फार काही आठवत नसल्याचं म्हटलं जात आहे. कांबळीला औषध घेण्याची आठवण राहत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.
विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे संभाव्य धोका पाहता कांबळीचे क्रिकेटपटू मित्र पुन्हा एकदा एक्शन मोडमध्ये आले आहेत. कांबळीच्या मित्रांनी आणि क्रिकेटपटूंनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आवश्यक उपचारांसाठी आर्थिक मदत करता यावी या हेतूने व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये सचिन तेंडुलकर असल्याचंही म्हटलं जात आहे.
कांबळीच्या मित्राने काय सांगितलं?
मित्र मार्कस कुटो यांनी विनोद कांबळी याच्या तब्येतीबाबत माहिती दिलीय. विनोदच्या मेंदूत रक्ताची गाठी तयार झाल्या आहेत. विनोदने पथ्य न पाळल्याने त्या गाठी काढता येणार नाहीत. तसेच विनोद कांबळी याला ब्रेन स्ट्रोकचा धोका आहे”, अशी माहिती मार्कस कुटो यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिली. त्यामुळे चाहत्यांची धाकधुक वाढली आहे.
“कांबळीने मद्यपान सोडलं आहे. मात्र त्याच्या सातत्याने विसरण्याच्या सवयीमुळे नव्या संकट समोर ओढावलं आहे. आपल्याला सिगरेट ओढायची नाही, याचा कांबळीला विसर पडतो. त्यामुळे कांबळी ये-जा करणाऱ्यांकडून सिगरेट मागतो. आता कांबळीच्या किडनी, हॉर्ट आणि लिव्हरला कोणतीही हाणी झालेली नाही. मात्र कांबळीच्या मेंदूवर परिणाम होत आहे. त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडत आहे”, असंही मार्कस कुटो याने स्पष्ट केलं.