
वैभव सूर्यवंशीने अल्पवधीत आणि कमी वयातच नावलौकिक मिळवला आहे. आता त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं लवकरच खुली होणार आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीने भविष्याच्या विचार करून डाएट करण्याचा निश्चय केला आहे. वैभवला लहानपणापासून मटण खायला आवडतं. मटण भात त्याचं आवडतं खाणं आहे, हे त्याच्या जवळच्या नातेवाईक आणि कुटुंबियांना माहिती आहे. पण त्याला आता डाएटच्या हिशेबाने यावर पाणी सोडावं लागलं आहे. असं असताना त्याचा राग कुठे ना कुठेतरी निघणार ना.. असं मिश्किलपणे त्याच्या मोठ्या भावाने सांगितंल आहे. रायझिंग स्टार आशिया कपमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाच्या दृष्टीने वैभवचा हा राग चांगला आहे असंच म्हणावं लागेल. आवडता पदार्थ मटण खायला मिळत नसल्याने त्याचा राग मैदानावर काढत आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी ही चांगली गोष्ट असं त्याच्या मोठ्या भावाने मुलाखतीत सांगितलं.
वैभव सूर्यवंशीचा मोठा भाऊ उज्ज्वल सूर्यवंशीने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना छोटा भाऊ वैभव आणि त्याच्या मटण प्रेमाची कहाणी सांगितली. त्याने सांगितलं की, क्रिकेटमध्ये आल्यानंतर वैभव सूर्यवंशीने आपल्या डाएट प्लानवर पूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याने डाएटिंग सुरु केली आहे. आता तो मटण भात खात नाही. त्यानंतर हसतच उज्ज्वलने सांगितलं की, मटण प्रेमाचा त्याग केल्याने वैभव नाराज आहे. त्याचा भुर्दंड कुठे ना कुठे गोलंदाजांना भोगावा लागत आहे. वैभव मटणाचा राग गोलंदाजांवर काढत आहे.
रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची दहशत पहिल्या सामन्यापासून पसरली आहे. वैभवने युएईविरूद्धच्या सामन्यात आक्रमक खेळी करत कंबरडं मोडलं. वैभव सूर्यवंशीने 42 चेंडूत 144 धावा केल्या. यात 15 षटकार आणि 11 चौकार मारले. युएईनंतर आता भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. पण क्रिकेटमध्ये चढउतार असतात. त्यामुळे तशीच खेळी होईल की नाही सांगता येत नाही. पण आक्रमक खेळी करून चांगली सुरुवात करून देऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानला धास्ती आहे. वैभवच्या मोठ्या भावाने सांगितल्याप्रमाणे जर त्याने मटणाचा राग पाकिस्तानी गोलंदाजांवर काढला तर त्यांना सळो की पळो करून सोडेल.