Asia Cup : टी 20I आशिया कप स्पर्धेत शतक करणारे 2 फलंदाज, तो एकमेव भारतीय कोण?

Century in Asia Cup T20 Format : टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2023 आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. या स्पर्धेतील सामने हे 50 षटकांचे होते. मात्र यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे.

Asia Cup : टी 20I आशिया कप स्पर्धेत शतक करणारे 2 फलंदाज, तो एकमेव भारतीय कोण?
Asia Cup Trophy
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Aug 18, 2025 | 9:49 PM

आशिया खंडातील वर्ल्ड कप स्पर्धा अर्थात आशिया कप 2025 स्पर्धेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदा आशिया कप टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. तसेच या 8 संघांची 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. टी 20 फॉर्मेटने या स्पर्धेतील सामने होणार असल्याने चाहत्यांना फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. टी 20 फॉर्मेटने झालेल्या आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत फक्त 2 फलंदाजांनाच शतक करता आलं आहे. या 2 फलंदाजांमध्ये 1 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. ते 2 फलंदाज कोण आहेत? तसेच त्यांनी कोणत्या संघााविरुद्ध तिहेरी आकडा गाठला होता? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात विराट कोहली आणि बाबर हयात या दोघांनी शतक केलं आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही प्रत्येकी 122 धावाच केल्या आहेत. विराटने ही 2022 मध्ये शतक केलं होतं. तर बाबर हयात याने 2016 मध्ये शेकडा ठोकला होता.

विराट कोहली

विराटने 8 सप्टेंबर 2022 रोजी अफगाणिस्तान विरुद्ध ही स्फोटक खेळी केली होती. विराट या सामन्यात केएल राहुल याच्यासह ओपनिंगला आला होता. या दोघांनी 12.4 ओव्हरमध्ये 119 धावांची सलामी भागीदारी केली होती

केएल राहुल याने 41 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या होत्या. तर विराट कोहली याने या 122 धावांची नाबाद स्फोटक खेळी केली होती. विराट 61 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकार ठोकले होते. या जोडीन केलेल्या वादळी खेळीमुळे भारताने 2 विकेट्स गमावून 212 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 111 धावाच करता आल्या. भारताने अशाप्रकारे हा सामना 101 धावांनी जिंकला.

बाबर हयात

हाँगकाँगच्या बाबर हयात याने 19 फेब्रुवारी 2016 रोजी ओमान विरुद्ध शतक ठोकलं होत. ओमानने 5 विकेट्स गमावून 180 धावा केल्या होत्या. ओमानसाठी जतिंदर सिंह याने 42 तर आमिर अली याने 32 धावा केल्या.

हाँगकाँगला प्रत्युत्तरात 7 विकेट्स गमावून 175 धावाच करता आल्या. हाँगकाँगला हा सामना जिंकता आला नाही. मात्र बाबरने आपली छाप सोडली. बाबरने 60 चेंडूत 7 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 122 धावांची तुफानी खेळी केली.