Virat Kohli Duck: विराट कोहलीला सलग दुसऱ्या सामन्यात मिळाला शून्य, 2022 नंतर पाहिला असा दिवस

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता प्लेऑफची चुरस वाढली असून करो या मरोची स्थिती आहे. असं असताना आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या फलंदाजीला ग्रहण लागलं आहे.

Virat Kohli Duck: विराट कोहलीला सलग दुसऱ्या सामन्यात मिळाला शून्य, 2022 नंतर पाहिला असा दिवस
विराट कोहलीला सलग दुसऱ्या सामन्यात मिळाला शून्य
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 10, 2026 | 10:17 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात दुसरा सामना होत आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात आरसीबीने बाजी मारली होती. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आरसीबीने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि मुंबई इंडियन्सला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 गडी गमवून 166 धावा केल्या आणि विजयासाठी 167 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून जेकॉब बेथेल आणि विराट कोहली जोडी मैदानात उतरली होती. मुंबई इंडियन्सने दिलेले आव्हान फार काही मोठं नव्हतं. त्यामुळे फलंदाजांवर तसं काही टेन्शन नव्हतं. मुंबई इंडियन्सकडून पहिलं षटक टाकण्यासाठी दीपक चाहर आला आणि स्ट्राईकला बेथेल होता. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारले आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेऊन विराटला स्ट्राईक दिली. चौथा चेंडूचा सामना दीपक चहरने वाइड टाकला आणि हा चेंडू परत टाकताना विराट कोहलीची विकेट काढली.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली गोल्डन डकवर बाद झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. आयपीएल स्पर्धेत चार वर्षानंतर सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाला. आयपीएलच्या सलग दोन डावांमध्ये विराट कोहली शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे . यापूर्वी 2022 च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध असे घडले होते. आता पुन्हा तसंच घडलं आहे. यंदाच्या पर्वात लखनौ सुपरजायंट्सविरुद्धही शून्यावर बाद झाला होता. त्या सामन्यात विराट कोहली प्रिन्स यादवच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला होता. आता दीपक चाहरने त्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे.

विराट कोहली आयपीएल 2026 स्पर्धेत टॉप 10 मध्ये आहे. त्याने 11 सामन्यापैकी 9 सामन्यात 379 धावा केल्या आहेत. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्याने 400 धावा गाठण्याच्या गतीला ब्रेक लागला आहे. विराट कोहली आणि दीपक चाहर यांचा आयपीएल स्पर्धेच्या 11 डावात आमनासामना झाला. त्यात विराट कोहलीने 60 चेंडूंचा सामना करत 80 धावा काढल्या. तर दीपक चाहरने त्याला दोनदा तंबूचा रस्ता दाखवला आहे.

Follow Us