आयपीएल रद्द होणार? भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बीसीसीआयपुढे असे पर्याय

पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने दहशतवादाचं कंबरडं मोडण्याचं काम हाती घेतलं आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी ठिकाणांवर निशाणा साधला आहे. यामुळे दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तान सरकार हादरलं आहे. पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांवर ड्रोन अटॅक केला. याचा परिणाम आयपीएलवर दिसून आला आहे.

आयपीएल रद्द होणार? भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बीसीसीआयपुढे असे पर्याय
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स
Image Credit source: PTI
| Updated on: May 09, 2025 | 9:00 AM

पाकिस्तान सरकार हे दहशतवाद्यांच्या हाताचं बाहुलं आहे हे सर्व जगाला माहिती आहे. त्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांचा पाकिस्तान सरकारवर दबाव वाढल्याने दुष्कृत्य सुरु केलं आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून हल्ले चढवले होते. पण भारताने प्रत्येक हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं. पण याचा प्रभाव आयपीएल स्पर्धेवर झाल्याचं दिसून आलं आहे. सीमेपासून 150 किमी लांब असलेल्या धर्मशाळेत पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु होता. हा सामना अर्धवट स्थितीत थांबवावा लागला. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला गेला. दुसरीकडे, 11 मे रोजी याच ठिकाणी होमार सामना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केला आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर 9 मे रोजी बीसीसीआयची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागून आहे. बीसीसीआयकडे काय पर्याय आहेत? चला जाणून घेऊयात सविस्तर

बीसीसीआयपुढे कोणते पर्याय?

आयपीएलचे चेअरमन अरूण धूमल यांनी गुरुवारी सांगितलं होतं की, स्पर्धा सुरु ठेवायची की नाही याबाबत सरकारच्या सूचनांची वाट पाहिली जात आहे. आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवायचे की पुढे ढकलायचे हा निर्णय सरकारच्या हाती आहे. पण क्रिकेटचं व्यस्त वेळापत्रक पाहता बीसीसीआयला ही स्पर्धा काहीही करून आताच पूर्ण करणं भाग आहे. कारण त्यानंतर उर्वरित सामने पूर्ण करणं कठीण होईल. कारण मार्च ते मे या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत. त्यामुळे या व्यतिरिक्त इतर दिवशी सामने खेळवणं कठीण होईल.

बीसीसीआय स्पर्धेचं आयोजन सुरक्षित ठिकाणी करू शकते. म्हणजेच सीमेपासून लांब असलेल्या मैदानात स्पर्धेचं आयोजन करू शकते. याचा अर्थ असा की होम आणि अवे फॉर्मेट रद्द केला जाऊ शकतो. जेणेकरून खेळाडूंचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि उर्वरित सामने देशातच पूर्ण करता येतील. 11 मे रोजी होणारा मुंबई पंजाब सामनाही अहमदाबादला शिफ्ट करण्यात आला आहे.

बीसीसीआय आयपीएल स्पर्धा दुसऱ्या देशात शिफ्ट करण्याचा निर्णय घेऊ शकते. भारताने काही संकट ओढावलं तर इतर देशात सामने आयोजित करते. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलचे उर्वरित सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत इतर पर्याय शोधू शकते. बीसीसीआय श्रीलंकेत काही सामने आयोजित करू शकते.

आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा शेवटचा पर्यात बीसीसीआयच्या हाती असू शकतो. कोरोना संकटात आयपीएल 2021 स्पर्धा दोन टप्प्यात खेळवण्यात आली होती. 4 मे 2021 रोजी आयपीएल स्पर्धा कोरोना रुग्ण वाढत असल्याने स्थगित केली होती. यानंतर आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये आयोजित केला होता. पहिल्या टप्प्यात 29 सामने, तर दुसऱ्या टप्प्यात 31 सामने झाले होते.