अजिंक्य रहाणेनंतर केकेआरचा कॅप्टन कोण होणार? हे नाव आघाडीवर; पण…
आयपीएल 2027 स्पर्धेची मोर्चेबांधणी सुरू असताना अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. केकेआरला एक नवा कर्णधार विकत घ्यावा लागेल किंवा संघातील उरलेला एक पर्याय वापरावा लागेल.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने 30 जुलै 2026 रोजी सकाळी क्रिकेटमधून निवृत्त झाल्याचं जाहीर केलं. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आता मैदानाबाहेर असणार आहे. अजिंक्य रहाणेने उचललेल्या या पावलामुळे आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाला धक्का बसला आहे. कारण मागच्या दोन पर्वात अजिंक्य रहाणेने या फ्रेंचायझीचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे कर्णधारच स्पर्धेतून आऊट झाल्याने केकेआरपुढे पेच निर्माण झाला आहे. आता केकेआरला आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा करावी लागणार आहे. सध्या केकेआरचा संघ पाहता त्यांच्याकडे कर्णधारपदासाठी फार काही पर्याय नाहीत. त्यामुळे पुढचा कर्णधार कोण होणार? याची खलबतं सुरू झाली आहेत.
अजिंक्यकडे नेतृत्व कसं आलं? केकेआरकडे एकच पर्याय, पण..
केकेआरने श्रेयस अय्यरला सोडल्यानंतर आयपीएल 2025 मध्ये सूत्र अजिंक्य रहाणेच्या हाती दिली. खरं तर मेगा लिलावापूर्वीच केकेआरला कर्णधाराची गरज होती. त मेगा लिलावात 1.5 कोटी रुपयांना अजिंक्य रहाणेला खरेदी केलं आणि त्याच्याकडे धुरा सोपवली होती. पण त्याच्या नेतृत्वात केकेआरची कामगिरी संमिश्र राहिली. एकूण 26 सामन्यात अजिंक्य रहाणेने नेतृत्वत केलं त्यापैकी 14 सामने गमावले, तर 11 सामन्यात विजय मिळवला. एक सामना अनिर्णित ठरला. त्याच्या नेतृत्वात केकेआरची विजयी टक्केवारी 42.3 टक्के राहिली. आता त्याने निवृत्ती घेतल्याने केकेआरमध्ये एकच पर्याय आहे तो म्हणजे रिंकु सिंह.. सध्या संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे. पण त्याच्यावर विश्वास टाकणं केकेआरसाठी धोक्याचं ठरू शकतं.
रिंकु सिंहचा सध्या फॉर्म नाही. त्यामुळे टीम इंडियातही त्याचं स्थान पक्कं नाही. आता फक्त मॅच फिनिशर म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यात गोलंदाजीही खूपच कमी करतो. त्यात त्याच्याकडे नेतृत्व गुणांचा अभाव असल्याचं दिसून येतं. आयपीएल 2026 स्पर्धेत अजिंक्य रहाणेला पायात गोळा आल्याने मैदान सोडावं लागलं होतं. तेव्हा उर्वरित सामन्यात उपकर्णधार रिंकुने जबाबदारी पार पडली होती. पण त्याला नेतृत्व व्यवस्थितरित्या पार पडता आलं नाही. 220 धावांचं बलाढ्य लक्ष्य मुंबई इंडियन्ससमोर होतं. पण गोलंदाज वापरताना रिंकु चुकला होता. फिरकीपटू सुनील नरीनला गोलंदाजीच दिली नाही. तर कॅमरून ग्रीन आणि रमणदीपकडेही चेंडू सोपवला नाही. त्यात फिरकी गोलंदाज अनुकुल रॉयने केवळ एक षटक टाकले होते. म्हणजेच रिंकुला गोलंदाजांचं रोटेशन करता आलं नाही.
केकेआर काय करणार?
केकेआरकडे कर्णधारपदासाठी दोन पर्याय आहेत. एक तर आयपीएल 2027 लिलावात कर्णधारपद भूषवेल अशा खेळाडूसाठी बोली लावावी लागेल. अन्यात ट्रेड विंडोच्या माध्यमातून कर्णधारपदाचा पर्याय शोधावा लागेल. सध्या हार्दिक पांड्याचं नाव ट्रेड विंडोत चर्चेत आहे. केकेआर त्याच्यासाठी फिल्डिंग लावू शकते. कारण केकेआरला आता खेळाडू नाही तर कर्णधारही हवा आहे.