IND vs SL : शफाली वर्माची वादळी खेळी, टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा

India Women vs Sri Lanka Women 2nd T20I Match Result : वूमन्स टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये तिसरा टी 20i सामना जिंकला आहे. शफाली वर्मा ही टीम इंडियाच्या विजयाची नायिका ठरली.

IND vs SL : शफाली वर्माची वादळी खेळी, टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा
Shafali Verma Team India
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Dec 23, 2025 | 10:28 PM

ओपनर शफाली वर्मा हीने केलेल्या नाबाद आणि विस्फोटक खेळीच्या जोरावर वूमन्स टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात धमाकेदार विजय मिळवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियासमोर 129 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हा सामना 49 बॉलआधी 7 विकेट्सने जिंकला. भारताने 11.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 129 धावा केल्या. भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात शफाली वर्मा व्यतिरिक्त जेमीमाह रॉड्रिग्स, स्मती मंधाना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर यांनीही बॅटिंगने योगदान दिलं. टीम इंडियाने या विजयासह मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे.

शफाली वर्माचा अर्धशतकी तडाखा

स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने भारताला आश्वासक सुरुवात मिळवून दिली. मात्र स्मृती सलग दुसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात मिळूनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. स्मृतीच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. स्मृतीने 11 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 14 धावा केल्या. भारताने 29 धावांवर स्मृतीची विकेट गमावली. स्मृती आऊट झाल्यानंतर मैदानात आलेल्या जेमीमाह रॉड्रिग्स हीने शफालीला भक्कम साथ दिली. दोघाींनी चौफेर फटकेबाजी केली. जेमीकडे अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र जेमी त्याआधीच आऊट झाली.

जेमी आणि शफालीने 27 बॉलमध्ये 58 रन्सची पार्टनरशीप केली. जेमीने 15 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह 26 रन्स केल्या. जेमीनतंर कॅप्टन हरमनप्रीत कौर मैदानात आली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 24 बॉलमध्ये 41 धावांची भागीदारी केली. भारताला विजयासाठी अवघी 1 धाव हवी असताना हरमनप्रीत फटका मारण्याच्या प्रयत्नात बोल्ड झाली. हरमनने 10 धावा केल्या. त्यानंतर रिचा घोष हीने 1 धाव केली. भारताने अशाप्रकारे विजय मिळवला. शफालीने 34 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 69 धावा केल्या. मालिकी मदारा, काव्या काविंदी आणि कविषा दिलहारी या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

टीम इंडियासमोर श्रीलंका ढेर

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी कर्णधार हरमनप्रीत कौर हीचा निर्णय योग्य ठरवला. श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांसमोर 9 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 128 धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेसाठी हर्षित समरविक्रमा हीने 33 तर कॅप्टन चमारी अट्टापट्टू हीने 31 धावा केल्या. तर भारतासाठी वैष्णवी शर्मा श्री चरणी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.