Womens World Cup 2022: वेस्ट इंडीज विरुद्ध विजयासाठी भारताला हे करावंच लागणार, पाच आघाड्यांवर लढाई
भारतीय महिला संघ शनिवारी आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Womens World Cup 2022) तिसरा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडनंतर टीम इंडियाचा सामना आता वेस्ट इंडिज विरुद्ध (IND W vs WI W) होणार आहे.
मुंबई : भारतीय महिला संघ शनिवारी आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Womens World Cup 2022) तिसरा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडनंतर टीम इंडियाचा सामना आता वेस्ट इंडिज विरुद्ध (IND W vs WI W) होणार आहे. भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्याच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यजमान न्यूझीलंडने (New Zealand) या सामन्यात भारतावर 62 धावांनी मात केली होती. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. भारतीय महिला संघ वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळला आहे. त्यापैकी एक सामना जिंकला आहे तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे.
वर्ल्डकप बद्दल बोलायचे झाल्यास वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाची बाजू वरचढ आहे. कारण या स्पर्धेत आतापर्यंत भारताचा वेस्ट इंडिजकडून कधीच पराभव झालेला नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. हे सहा सामने भारताने जिंकले आहेत. दरम्यान, महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध विजय आयवश्यक आहे. या विजयासाठी टीम इंडियाला पाच आघाड्यांवर काम करावं लागेल.
- कोणत्याही गेममध्ये जिंकण्यासाठी योग्य मानसिकता असणे सर्वात महत्त्वाचे असते. हे लक्षात घेऊन टीम इंडियाच्या फलंदाजांना मैदानात उतरावे लागेल. विशेषत: स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि यास्तिका भाटिया या अव्वल 3 फलंदाजांना दबाव झुगारुन खेळावं लागेल. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये चौकार-षटकार आले नाहीत तरी हरकत नाही, पण निदान स्ट्राईक रोटेट करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
- स्मृती मानधना ही टीम इंडियाची सर्वात मोठी मॅच विनर आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मानधनाला तिची विकेट वाचवून खेळावे लागेल. या फलंदाजाला सुरुवातीची धावगती लक्षात न ठेवता पूर्ण 50 षटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण जोपर्यंत मानधना क्रीजवर आहे, तोपर्यंत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा कायम राहणार आहेत.
- टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध 162 बॉल डॉट खेळले. ही आकडेवारी खरोखरच निराशाजनक आहे. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये स्ट्राइक बदलल्याने प्रतिस्पर्ध्यांवर दबाव येतो आणि जर तसे झाले नाही तर आपला पराभव निश्चित समजा. मग टीम इंडियाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की मधल्या फळीत फक्त हरमनप्रीत कौर एक अशी फलंदाज आहे जी मोठे फटके मारू शकते. अशा स्थितीत प्रत्येक फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करावा लागेल.
- टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल टाळावेत. शेफाली वर्माऐवजी यास्तिका भाटियाला संघाने संधी दिली. ती न्यूझीलंडविरुद्ध संथ खेळली पण केवळ एका सामन्याच्या आधारे तिला पुन्हा संघातून वगळणे म्हणजे पॅनिक बटण दाबल्यासारखे होईल.
- हेली मॅथ्यूजला लवकरात लवकर बाद करणे आवश्यक आहे. वेस्ट इंडिजच्या या फलंदाजाने गेल्या दोन सामन्यात 164 धावा केल्या आहेत. ज्यात एका शतकाचा समावेश आहे. या खेळाडूची विकेट घेणे खूप महत्त्वाचे आहे. मॅथ्यूजने गोलंदाजीतही 4 बळी घेतले आहेत. ही अष्टपैलू खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे मानले जात आहे.
इतर बातम्या
IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर
IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत
IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?