वैभव सूर्यवंशीची बॅट स्विंग पाहून युवराज सिंगही आवाक्, पण एक मोठी गोष्ट सांगून गेला
वैभव सूर्यवंशी वयाच्या 15 व्या वर्षी क्रिकेटमध्ये नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून त्याने एक झलक दाखवून दिली. वैभव सूर्यवंशीची बॅट स्विंग पाहून युवराज सिंगही आवाक् झाला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झाला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने कमाल केली. अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि राजस्थानच्या विजयाचा मोलाचा हातभार लावला. फक्त वयाच्या 15व्या वर्षी त्याची अशी फलंदाजी पाहून सिक्सर किंग युवराजही आवाक् झाला आहे. वैभव सूर्यवंशी युवराज सिंगसारखाच डावखुरा फलंदाज आहे. तसेच षटकार मारण्याची क्षमता आहे. कमी वयातच त्याने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे युवराज सिंगने वैभव सूर्यवंशीच्या बॅट स्विंगचं कौतुक केलं. इतकंच काय तर वैभव सूर्यवंशीचा बॅट स्पीड त्याच्यापेक्षा अधिक असल्याचं सांगितलं आहे. पण त्याच्या स्तुतीसुमनं उधळताना एक इशारा देखील दिला आहे. युवराज सिंगने अनुभवाच्या जोरावर वैभव सूर्यवंशीला नेमका काय सल्ला दिला आहे ते जाणून घेऊयात…
युवराज सिंग म्हणाला की…
युवराज सिंगने वैभव सूर्यवंशीचं कौतुक करताना म्हणाला की, ‘वैभव सूर्यवंशीची सर्वात खास बाब म्हणजे त्याच्या बॅटचा स्पीड आहे. त्याचा बॅटचा स्पीड खरंच खूप अधिक आहे. माझी बॅट स्पीडही अशी नव्हती. मी काही खेळाडू असे पाहिले आहेत की त्याचा हात खूप वेगाने जातो. तो ज्या पद्धतीने ऑफ साईडच्या चेंडूवर षटकार मारतो. त्यावरून त्याची खरी क्षमता अधोरेखित होते.’ युवराज सिंगने त्याला एक सल्लाही दिला. त्याने वैभवला डोकं शांत आणि संतुलित ठेवावं लागेल असं सांगितलं. युवराज सिंग म्हणाला की, ‘100 टक्के त्याच्यात चांगलं टॅलेंट आहे. पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खेळताना डोकं शांत आणि संतुलित ठेवणं आवश्यक आहे.’
वैभव सूर्यवंशी जबरदस्त फॉर्मात
वैभव सूर्यवंशीने आपला फॉर्म काय आहे ते पहिल्या सामन्यातच दाखवून दिलं आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात फक्त 17 चेंडूत 52 धावा ठोकल्या. यात पाच षटकार आणि चार चौकार मारले. वैभव सूर्यवंशीचा स्ट्राईक रेट हा 305 पेक्षा अधिकचा होता. यात खेळपट्टीवर चेन्नईचा संपूर्ण संघ 127 धावांवर तंबूत होता. त्याच खेळपट्टीवर वैभव सूर्यवंशीने कमाल केली. त्याच्या चांगल्या सुरूवातीमुळे संघाला फायदा झाला आणि विजय सोपा झाला.