दारुच्या नशेत माजी भारतीय क्रिकेटपटूकडून मोठा अपघात, कोणाला उडवलं? याआधी जाऊन आलाय तुरुंगात
Drunk Driving: दारुच्या नशेत माजी भारतीय क्रिकेटपटूने तीन गाड्यांना जोरदार धडक दिली आहे. ज्यामुळे क्रिकेटपटूच्या आणि अन्य तीन गाड्यांचं मोठं नुकसान झालं... सध्या या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Drunk Driving: भारताचा माजी क्रिकेटपडू आणि वडोदरा रणजी संघाचा कर्णधार राहिलेल्या जॅकब मार्टिन याला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दारुच्या नशेत ड्राईव्ह करत असताना मार्टिन याने तब्बल तीन गाड्यांना जोरदार धडक दिली. गंभीर घटनेनंतर पोलिसांनी क्रिकेटपटूला ताब्यात घेतलं असून, याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. सांगायचं झालं तर, जॅकब मार्टिन याची ही पहिली वेळ नाही, जेव्हा तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याआधी देखील अनेक प्रकरणांमुळे जॅकब मार्टिन अडचणीत सापडला आहे.
घटना आणि पोलिसांची कारवाई…
वडोदरा येथील अकोटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पुनीत नगर सोसायटीजवळ पहाटे अडीच वाजता घडला. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकब मार्टिन याचं स्वतःच्या गाडीवरील नियंत्रण सुटलं होतं. दारुच्या नशेत जॅकब मार्टिन याने अन्य तीन गाड्यांनी मारलेली धडक इतकी जोरदार होती की, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
नुकसान झालेल्या गाड्यांच्या मालकांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी निष्काळजीपणा आणि मद्यपान करून गाडी चालवल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नाही तर, जॅकब मार्टिन याची कार देखील जप्त करण्यात आली आहेत.
जॅकब मार्टिन याचं क्रिकेट करियर
जॅकब मार्टिन याने भारतीय क्रिकेट टीमसाठी 10 वनडे सामने खेळले. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने फारसा प्रभाव पाडला नसला तरी, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक प्रमुख नाव होता. त्याने बडोदा संघाचे नेतृत्व केलं आणि त्याच्या संघाला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले.
विवाद आणि कायदेशीर खटल्यांचा इतिहास
सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा जॅकब मार्टिन कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. 2011 मध्ये देखील जॅकब मार्टिन याला पोलिसांनी अटक केली होती. मानवी तस्करी प्रकरणात जॅकब याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यावर बनावट कागदपत्रांचा वापर करून तरुणांना परदेशात पाठवणाऱ्या टोळीत सहभागी असल्याचा आरोप होता. आता देखील जॅकब मार्टिन याने दारुच्या नशेत तीन गाड्यांना उडवलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
