Sunil Gavaskar | सुनील गावस्कर यांनी राज्य सरकारला जमीन 33 वर्षांनी परत केली, काय घडलं कारण?

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी महाराष्ट्र सरकारची जमीन परत केली आहे. क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी ही जमीन घेतली होती, मात्र काही कारणास्तव हे काम पूर्ण झाले नाही.

Sunil Gavaskar | सुनील गावस्कर यांनी राज्य सरकारला जमीन 33 वर्षांनी परत केली, काय घडलं कारण?
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 5:41 PM

मुंबईः भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मुंबईत क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी 33 वर्षांपूर्वी घेतलेली जमीन परत केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) गावस्कर यांनी ही जमीन घेतली होती. मात्र काही कारणास्तव हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बांद्रा परिसरातील या जमिनीचा काही दिवसांपूर्वी उल्लेख केला होता. गावस्कर यांना देण्यात आलेल्या जमिनीचा योग्य वापर न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या भूखंडावर क्रिकेट अकादमी (Cricket Academy) स्थापन केली जाणार होती. मात्र तीन दशकानंतरही ती प्रत्यक्षात सुरु झाली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती. दरम्यान,आता सुनील गावस्कर यांनी महाराष्ट्राच्या गृहनिर्माण व नगर विकास प्राधिककरण (एमएचएडीए) विभागाला हा भूखंड परत दिल्याची माहिती राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सचिन तेंडुलकरसोबत उभारणार होते अकादमी

सुनील गावस्कर हे लोकप्रिय खेळाडू सचिन तेंडुलकरसोबत ही क्रिकेट अकादमी स्थापन करणार होते. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चादेखील झाली होती. मात्र अनेक वर्षांपासून ही जमीन गावस्कर यांच्या ताब्यात असूनही त्यावर काहीच अंमलबजावणी झालेली नाही. क्रिकेट अकादमी उभारू शकले नाही, अशा आशयाचे पत्रही त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. एमएचएडीएने गावस्कर यांना सदर जमीन परत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, त्यांनी हा व्यवहार केल्याची माहिती हाती आली आहे.

जागतिक स्तरावरील क्रिकेटपटू

सुनील गावस्कर हे केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट क्रिकेटपटू असून उत्तम बॅट्समनमध्ये त्यांची गिनती होते. सुनीव गावस्कर यांनी भारसाठी 125 टेस्ट मॅच खेळल्या असून त्यांनी जवळफास 10122 रन काढले आहेत. सुनील गावस्कर यांनी 34 टेस्ट शतक मारले आहेत. दीर्घ कालावधीसाठी हा रेकॉर्ड त्यांच्या नावावर होता. तसेच त्यांनी 108 वन डे मॅच खेळल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्यांनी फक्त एक शतकच केले आहे.