
Shubman Gill : आशिया चषक 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. भारतीय संघात समावेश केलेल्या तसेच संघाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची नावे समोर आल्यानंतर काही क्रिकेट रसिकांनी आनंद व्यक्त केला तर काही लोकांनी बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली. आशिया चषकासाठीच्या भारतीय संघात शुभमन गिला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याला मात्र संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुले श्रेयसचे चाहते चांगलेच नाराज आहेत. दरम्यान, आता शुभमन गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी कशी मिळाली, याबाबतची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
याआधी भारताच्या टी-20 संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी अक्षर पटेल याच्याकडे असायची. आता मात्र शुभमन गिलची टी-20 संघात एन्ट्री झाली असून अक्षर पटेलचे उपकर्णधारपद गिलला देण्यात आले आहे. श्रेयस अय्यरला तर संघाच्या बाहेरच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अक्षर पटेलकडून उपकर्णधारपद का काढून घेण्यात आले? नेमकं काय घडलं असाव? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याच शिफारशीनुसार शुभमन गिलला भारताच्या टी-20 संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
एका रिपोर्टनुसार 19 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या भारतीय संघात शुभमन गिलकडे अगोदर उपकर्णदारपदाची जबाबदारी देण्यात येणार नव्हते. या पदासाठी शुभमन गिल हा पहिली पसंत नव्हता. मात्र गौतम गंभीरनेच शुभमन गिलच्या नावाची शिफारस केली होती. शुभमनलाच उपकर्णधारपद मिळावं, असा आग्रह गौतमने धरला होता. त्यामुळे संघनिवडकर्त्यांना तसा निर्णय घ्यावा लागला. संघ निवडीच्या बैठकीत गौतम गंभीर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. शुभमन गिल हा भविष्यातील कर्णधार आहे, असे म्हणत गंभीर यांनी गिलला उपकर्णधारपद द्यावं, अशी भूमिका घेतली. त्यानंतर गौतम गंभीर यांच्या मागणीनुसार निर्णय घेण्यात आला.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा आणि रिंकू सिंह, असे एकूण पंधरा खेळाडू भारतीय संघात असतील.