Harmanpreet Kaur: भारतीय संघ ट्रॉफी उचलण्यापासून एक पाऊल दूर, फायनलसाठी टीम इंडियाचा फुलप्रुफ प्लान हरमप्रीत कौरनं सांगितला
IND W vs SL W: भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया कपचा फायनल सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे प्लानिंग काय असणार आहे याबद्दल आता हरमनप्रीत कौरने भाष्य केले आहे.

INDW vs SLW: भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने श्रीलंकेविरुद्धच्या महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यापूर्वी आपल्या संघाला आत्मविश्वासाने खेळण्याचा सल्ला दिला आहे. या सामन्यात गेल्या हंगामातील पराभवाचा बदला घेऊन विजेतेपद पटकावण्याचे त्यांचे ध्येय आहे. भारत आणि श्रीलंका हे स्पर्धेतील दोन सर्वात बलाढ्य संघ म्हणून उदयास आले आहेत आणि रविवारी विजेतेपदाच्या लढतीत ते आमनेसामने येतील.
अंतिम सामन्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत हरमनप्रीत म्हणाली, “जेव्हा तुम्ही स्पर्धा जिंकण्यासाठी महत्त्वाचा सामना खेळत असता, तेव्हा फक्त आपल्या सामर्थ्यानुसार खेळणे आणि त्या दिवशी त्यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असते. खूप काही करण्याचा किंवा काहीतरी विलक्षण करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, आपल्या सामर्थ्यावर टिकून राहणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आपल्या निर्णयांवर श्रद्धा ठेवणे महत्त्वाचे आहे.”
हरमनप्रीत कौरने कबूल केले की “दुबईच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. अंतिम सामन्यात, फलंदाजांना आक्रमक फटके खेळण्यापूर्वी क्रीजवर काही वेळ घालवावा लागेल. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे थोडे कठीण आहे, पण आपल्याला स्वतःवर आणि आपल्या ताकदीवर विश्वास ठेवावा लागेल, आम्हाला माहित आहे की आमची फलंदाजी मजबूत आहे. त्या दिवशी जो खेळाडू चांगल्या स्थितीत असेल, त्याने जबाबदारी घेऊन संघाला विजयाकडे नेले पाहिजे. तुम्हाला क्रीजवर थोडा वेळ घालवावा लागेल आणि मग फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. जो फलंदाज स्थिरावतो, त्याने जबाबदारी घेऊन शेवटपर्यंत खेळले पाहिजे.”
श्रीलंकेची स्टार सलामीवीर चमारी अटापट्टू हिच्याबद्दल विचारले असता, हरमनप्रीत म्हणाली की, “भारताला तिला लवकर बाद करायला आवडेल, पण संघाचे संपूर्ण लक्ष तिच्यावर नसेल. आम्हाला तिची विकेट लवकरात लवकर घ्यायला नक्कीच आवडेल, कारण आम्हाला माहित आहे की फलंदाजी करताना ती किती धोकादायक ठरू शकते. आम्ही त्यांच्याविरुद्ध एक ठोस रणनीती आखू, पण केवळ त्यांच्याविरुद्धच नाही, तर सर्व फलंदाजांविरुद्धही. ”
दोन वर्षांपूर्वी मागील हंगामाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला पराभूत केले होते. हरमनप्रीत म्हणाली की, तिचा संघ या सामन्याकडे एका मजबूत आणि एका कमकुवत संघातील लढाई म्हणून पाहत नाही. मागच्या वेळी जेव्हा आम्ही श्रीलंकेविरुद्ध खेळलो, तेव्हा त्यांची रणनीती खूपच ठोस होती आणि त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. टी-२० क्रिकेटमध्ये, जो संघ एका विशिष्ट दिवशी चांगला क्रिकेट खेळतो तोच जिंकतो. एक संघ दुसऱ्यापेक्षा अधिक मजबूत किंवा कमकुवत आहे यात काही शंका नाही. महत्वाच्या दिवशी फक्त चांगला क्रिकेट खेळायचे असते. संघातील प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आहे आणि त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरते.”
ती म्हणाली, “संघातील प्रत्येकजण महत्त्वाचा आहे आणि त्यांचे योगदान आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. ज्याला संधी मिळत आहे, तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे हे पाहून आनंद होतो. फलंदाजी युनिट कठीण परिस्थितीतही धावा करण्यात यशस्वी ठरले आहे, तर गोलंदाजांनीही गरजेच्या वेळी दमदार कामगिरी केली आहे.”
