IND vs PAK : T20 वर्ल्डकपमध्ये पुन्हा भारत-पाकिस्तान सामना रंगणार? वाचा समीकरण

IND vs PAK Match : टी 20 वर्ल्डकपच्या लीग स्टेजमधील भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर आता हे दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांशी भिडण्याची शक्यता आहे.

IND vs PAK : T20 वर्ल्डकपमध्ये पुन्हा भारत-पाकिस्तान सामना रंगणार? वाचा समीकरण
IND vs PAK Match
Image Credit source: X
| Updated on: Feb 16, 2026 | 3:13 PM

रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशी सर्व क्षेत्रात चमकदार कामगिरी करत पाकस्तानवर 61 धावांनी मात केली. मात्र आता पुन्हा एकदा या दोन्ही संघांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी काही समीकरणे जुळून येणे महत्वाचे आहे. भारतीय संघाने सुपर 8 मधील आपले स्थान निश्चित केले आहे, आता पाकिस्तानला सुपर 8 मध्ये जागा मिळवण्यासाठी नामिबियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक असणार आहे.

सुपर 8 मध्ये कोणते संघ सामील होऊ शकतात?

पाकिस्तानने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर हा संघ ग्रुप अ च्या पॉइंट्स टेबलमध्ये ते दुसऱ्या स्थानावर राहील आणि सुपर 8 मध्ये जागा निश्चित करेल. तसेच उर्वरित तीन गटांमधील अव्वल दोन संघ सुपर 8 मध्ये जागा मिळवतील. जर कोणताही मोठा उलटफेर झाला नाही तर ग्रुप अ मधून भारत आणि पाकिस्तान, ग्रुप ब मधून ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका, ग्रुप क मधून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज आणि ग्रुप ड मधून न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सुपर 8 मध्ये स्थान मिळवू शकतात. सुपर 8 चे संभाव्य गट खालील प्रमाणे असून शकतात.

  • ग्रुप 1: भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका
  • ग्रुप 2: इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका

सुपर 8 मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार नाहीत

सुपर 8 फेरीत प्रत्येक संघ आपापल्या गटातील प्रत्येक संघाविरुद्ध एक सामना खेळणार आहे. जर सुपर 8 गट वरील प्रमाणे राहिले तर भारत 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेशी, 26 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाशी आणि त्यानंतर शेवटचा सामना वेस्ट इंडिज विरुद् खेळू शकतो. याचाच अर्थ सुपर 8 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही.

भारत-पाकिस्तान सामना सेमीफायनलमध्ये आमने-सामने?

सुपर 8 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांनी चमकदार कामगिरी करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तर हे दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात. जर भारत गट 1 मध्ये अव्वल स्थानावर राहिला आणि पाकिस्तान सुपर 8 च्या गट 2 मधून उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरला तर हे दोन्ही संघ एकमेकांशी खेळताना दिसू शकता. मात्र दोन्ही पैकी एक संघ जर सेमीफायनलमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला तर मात्र दोन्ही संघांमध्ये पुन्हा सामना होणार नाही. तसेच दोन्ही संघ सुपर 8 मध्ये अव्वल स्थानावर राहिले आणि दोन्ही संघांनी आपापले सेमीफायनल सामने जिंकले तर दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना रंगण्याची शक्यता आहे.