करो या मरो..! हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, विजयी संघाला पुढच्या फेरीचं तिकीट, पण…
पुरूष हॉकी वर्ल्डकप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे भारता पाकिस्तान सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यात दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती असणार आहे. चला जाणून घेऊयात या सामन्याचं समीकरण आणि कसं काय ते सर्व

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी असून प्रत्येकी चार संघाची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघ ड गटात असून या गटात पाकिस्तान, इंग्लंड आणि वेल्स हे संघ आहे. साखळी फेरीत प्रत्येक गटातून दोन संघ पुढच्या फेरीत प्रवेश करणार आहेत. ड गटातून इंग्लंडचं पुढच्या फेरीत खेळणं निश्चित झालं आहे. तर दुसऱ्या संघासाठी भारत, पाकिस्तान आणि वेल्स या संघात चुरस आहे. त्यामुळे या गटातील भारत पाकिस्तान सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. कारण या सामन्यातील विजयी संघाला पुढच्या फेरीचं तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यात भारत पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने हा हायव्होल्टेज सामना असणार आहे. इतकंच काय तर दोन्ही संघासाठी या सामन्यात करो या मरोची स्थिती असणार आहे.
काय म्हणाला भारतीय हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग?
हॉकी वर्ल्डकप 2026 इंग्लंडविरुद्धचा सामना गमावल्यानतंर हरमनप्रीत सिंग म्हणाला की, ‘आम्ही चेंडूसोबत मूर्खपणाच्या चुका केला. पुढच्या सामन्यासाठी खूप काही शिकायला मिळालं. हा एक महत्त्वाचा सामना होता. पुढच्या गटात जाण्यासाठी आम्हाला अजून एक सामना खेळायचा आहे. पुढच्या सामन्यासाठी तयार आहोत, या सामन्यातून खूप काही शिकायला मिळालं. आमच्यासाठी हा फक्त एक खेळ आहे. आम्हाला आमचा खेळ खेळायचा आहे, लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायचं आहे.’ भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला की पुढच्या फेरीचं तिकीट पक्कं होणार आहे. अन्यथा गणित किचकट होईल.
भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावला तरी पुढच्या फेरीचं तिकीट मिळू शकते. पण यासाठी इंग्लंडने वेल्सला पराभूत करणं भाग आहे. त्यानंतर एक समीकरण जुळून येईल. भारताचा गोल फरक 0, तर पाकिस्तानचा -3 आहे. पाकिस्तानने भारताचा 1 किंवा 2 गोलने पराभव केला तरी गोलच्या बाबतीत पाकिस्तानच्या पुढे असेल. परिणामी भारताला दुसऱ्या स्थानावर राहून पुढच्या फेरीचं तिकीट मिळेल. पण पाकिस्तानने 3 पेक्षा जास्त गोल फरकाने पराभव केला तर भारताचं आव्हान संपुष्टात येईल.
पाकिस्तानला कशी मिळणार पुढच्या फेरीच संधी!
हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत ड गटात इंग्लंडने पाकिस्तानचा 4-1 ने धुव्वा उडवला होता. तर पाकिस्तानचा वेल्सविरुद्धचा सामना 3-3 ने बरोबरीत सुटला होता. त्यामुळे पाकिस्तानकडे फक्त 1 गुण असून चौथ्या स्थानावर आहे. त्यात पाकिस्तान 3 गोलने मागे आहे. तर वेल्सच्या खात्यातही 1 गुण आहे, पण 2 गोलने मागे असल्याने तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना महत्त्वाचा आहे. हा सामना ड्रॉ किंवा पाकिस्तानने गमावला तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. दुसरीकडे, भारताला नुसतं हरवून चालणार नाही तर गोलने पुढे यावं लागेल. कारण सध्या पाकिस्तानचा संघ 3 गोलने मागे आहे. त्यामुळे गोलचा फरक भरून काढण्याचं आव्हान असेल. इतकंच काय तर इंग्लंडने वेल्सला पराभूत करणंही भाग आहे. कारण वेल्सने इंग्लंडला हरवलं किंवा सामना ड्रॉ केला तरी वेल्सला संधी मिळू शकते.
भारत पाकिस्तान हॉकी सामना कधी?
भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना 19 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता हा सामना असेल. नेदरलँडच्या वैगनर हॉकी स्टेडियममध्ये हा सामना असणार आहे.