FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघ का नाही? नेमकं काय घडलं? सर्व काही जाणून घ्या
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरूवात झाली असून 48 संघ जेतेपदाच्या शर्यतीत आहेत. असं असताना या 48 संघात भारत का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 100 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या देश फुटबॉल स्पर्धेत पात्र ठरला नसल्याने आश्चर्य वाटत आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताची कामगिरी कशी राहिली आणि काय झालं ते सविस्तर जाणून घेऊयात...

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या पर्वाला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. या स्पर्धेचं यजमानपद पहिल्यांदाच तीन देशांकडे आहे. अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा या देशात ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ भाग घेत आहेत. मागच्या पर्वात फक्त 32 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. म्हणजेच यंदाच्या पर्वात 16 संघ अधिक आहेत. असं असताना या 48 संघात भारतीय संघ नाही याचं आश्चर्य वाटत आहे. फुटबॉल संघांची संख्या वाढूनही भारतीय संघ का नाही? असा प्रश्न फुटबॉलप्रेमींना पडल्याशिवाय राहात नाही. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पात्र होण्यासाठी भारतीय संघ आशियाई पात्रता फेरीत खेळत होता. या गटात भारतासह कतार, कुवेत आणि अफगाणिस्तान हे संघ होते. या गटात टॉप 2 असतील त्या संघांना फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट मिळणार होतं. या गटातून कतार आणि कुवेतने चांगली कामगिरी केली आणि फिफा वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळवलं. भारतीय फुटबॉल संघ या गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीत काय झालं?
फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीत तीन संघांसोबत भारताचे सहा सामने झाले. म्हणजेच प्रत्येक संघासोबत प्रत्येकी दोन सामने झाले. पहिला सामना 16 नोव्हेंबर 2023 रोजी कुवेत सिटीत कुवेतविरुद्ध झाला. हा सामना भारताने 1-0 ने जिंकला. त्यानंतर दुसरा सामना 21 नोव्हेंबर रोजी भारतात झाला आणि कतारने या सामन्यात भारताचा 3-0 ने पराभव केला. तिसरा सामना 21 मार्च 2024 रोजी सौदी अरेबियात अफगाणिस्तानविरुद्ध झाला आणि हा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. चौथ्या सामनन्यात भारत अफगाणिस्तान पुन्हा आमनेसामने आले. हा सामना भारतात गुवाहाटीत 26 मार्च 2024 रोजी झाला. हा सामना भारातने 2-1 ने गमावला आणि भारताचं खऱ्या अर्थाने फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं स्वप्न भंगलं. पाचवा सामना कुवेतविरुद्ध 6 जून 2024 कोलकात्यात झाला. पण हा सामनाही 0-0 ने बरोबरीत सुटला. सहाव्या सामन्यात कतारने भारताला 2-1 ने मात दिली. भारत या गटात तिसऱ्या स्थानी राहिला आणि फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं स्वप्न भंगलं.
कतारने सहा पैकी 5 सामन्यात विजय आणि 1 सामना बरोबरीत सोडवून 16 गुण मिळवले. तसेच या गटात पहिल्या स्थानी राहिला. कुवेने 6 पैकी 2 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि एक सामना बरोबरीत सोडवला. कुवेतने 7 गुणांची कमाई केली आणि दुसऱ्या स्थानी राहिला. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघाचे प्रत्येकी पाच गुण राहिले. दोन्ही संघांनी एका सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि दोन सामने बरोबरीत सोडवले. पण भारताची गोल संख्या उणे 4 होती, तर अफगाणिस्तानची गोल संख्या उणे 11 असल्याने भारत या गटात तिसऱ्या स्थानी राहिला. अफगाणिस्तानला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं.
भारतीय संघ 2030 वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरेल का?
फिफा वर्ल्डकप 2030 स्पर्धेच्या यजमानपदाबाबत अजून तरी काही ठरलं नाही. 2026 वर्ल्डकप स्पर्धेची सांगता झाल्यानंतर त्याची घोषणा करण्यात येईल. कारण या स्पर्धेला 2030 मध्ये 100 वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा सहा देशांमध्ये मिळून आयोजिक केली जाण्याची शक्यता आहे. यात मोरक्को, पोर्तुगाल आणि स्पेन हे मुख्य देश असू शकतात. तर सुरूवातीचे तीन सामने दक्षिण अमेरिकेतली तीन देशात खेळवले जाण्याची शक्यता आहे. पहिला ऐतिहासिक शताब्दी सामना उरूग्वे, त्याने त्याने पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेतील उपविजेत्या असलेल्या अर्जेंटिनात दुसरा सामना आणि दक्षिण अमेरिकेतली फुटबॉल महासंघाचे मुख्यालय असलेल्या पराग्वेत तिसरा सामना खेळवला जाण्याची योजना असल्याचं बोललं जात आहे. तर उर्वरित 101 समने युरोप आणि अफ्रिका खंडातील मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये होतील.
या स्पर्धेत भारत पात्र ठरेल की नाही हे आता सांगणं कठीण आहे. कारण या स्पर्धेसाठी पात्रता फेरी 2027 आणि 2028 या वर्षात पार पडतील. भारताने या पात्रता फेरीत कामगिरी उंचावली तर नक्कीच फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट मिळू शकते. कारण 48 देशात आशियातून 8 किंवा 9 देशांना फिफा वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळते. भारतीय संघाला अव्वल 9 स्थानात जागा मिळवण्यासाठी जापान, दक्षिण कोरिया, इराण, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, कतार, इराक आणि अझबेकिस्तानसारख्या बलाढ्य देशांना मागे टाकावं लागेल. दुसरीकडे, फिफा फुटबॉल रँकिंगममधध्ये भारत सध्या 139व्या स्थानावर आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करून 70-80 संघांच्या यादीत स्थान मिळवणं गरजेचं आहे.
भारताला 1950 मध्ये मिळाली होती संधी, पण…
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ 1950 मध्ये पात्र ठरला होता. पण असं असूनही भारतीय संघ एकही सामना खेळू शकला नाही. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच भारताने यातून माघार घेतली. 1950 च्या पात्रता फेरीत आशियाई गटात भारतासोबत इंडोनेशिया, म्यानमार आणि फिलिपिन्स हे देश होते. मात्र या तिन्ही देशांनी या स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे एकही सामना न खेळता भारताला स्पर्धेत एन्ट्री मिळाली होती. पण तेव्हा भारताने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला. खरं तर बूट नसल्याने खेळता आलं नाही अशी एक अफवा पसरवली जात आहे. पण त्याचं कारण ते नाही. तेव्हा भारताने फुटबॉल वर्ल्डकप पेक्षा सर्वोच्च असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेला प्राधान्य दिलं. त्यात फुटबॉल वर्ल्डकप ब्राझील असल्याने प्रवासासाठी 3-4 महिन्यांचा प्रवास करावा लागणार होता. त्यात मोठा खर्च पाहता भारताने माघार घेतली. त्यात खेळाडूंची निवड आणि सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने तसा निर्णय घ्यावा लागला.
फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन आणि यजमान देश
फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 1930 मध्ये सुरूवात झाली होती. तेव्हा ही स्पर्धा दक्षिण अमेरिकेतली उरूग्वे या देशात आयोजित केली होती. तेव्हा सर्व सामने हे मॅटिव्हिडीओ शहरात खेळवले गेले होते. त्यावेळेस पात्रता फेरी नव्हती. पण निमंत्रण देऊनही फक्त 13 देश सहभागी झाले होते. त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत उरुग्वेने अर्जेंटिनाला 4-2 ने पराभूत करून पहिलं जेतेपद पटकावलं होतं.
फिफा वर्ल्डकप स्पर्धा दर चार वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. पण 1942 आणि 1946 साली दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. पण हे दोन वर्ष वगळता दर चार वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 1930 उरुग्वे, 1934 इटली, 1938 फ्रान्स, 1942-1948 (दुसऱ्या महायुद्ध त्यामुळे स्पर्धा झाली नाही), 1950 ब्राझील, 1954 स्वित्झर्लंड, 1958 स्वीडन, 1962 चिली, 1966 इंग्लंड, 1970 मॅक्सिको, 1974 पश्चिम जर्मनी, 1978 अर्जेंटिना, 1982 स्पेन, 1986 मॅक्सिको, 1990 इटली, 1994 अमेरिका, 1998 फ्रान्स, 2002 दक्षिण कोरिया/जापान, 2006 जर्मनी, 2010 दक्षिण अफ्रिका, 2014 ब्राझील, 2018 रशिया, 2022 कतार या देशांनी यजमानपद भूषवलं आहे. 2026 मध्ये अमेरिका-मॅक्सिको आणि कॅनडा या देशांकडे यजमानपद आहे.
फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे विजेते
फिफा वर्ल्डकप स्पर्धेवर ब्राझील संघाचा दबदबा राहिला आहे. या संघाने पाच जेतेपदाला गवसणी घातली आहे. 1958, 1962, 1970, 1994 आणि 2002 साली जेतेपद मिळवलं आहे. जर्मनीने 4 वेळा, इटलीने 4 वेळा, अर्जेंटिनाने 3 वेळा, फ्रान्सने 2 वेळा, उरुग्वेने 2 वेळा, इंग्लंड आणि स्पेनने एकदा जेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत इटली, ब्राझील यांनी सलग दोन वेळा जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला आहे. इटलीने 1934 आणि 1938, तर ब्राझीलने 1958 आणि 1962 ला सलग दोन वेळा जेतेपद मिळवलं होतं.
