
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकल्याने सगळ्या देशात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून रेकॉर्ड तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सेलीब्रेशन केलं. आता हे सर्व प्लेयर आपपाल्या घरी पोहोचले आहेत. तिथे त्यांचं जोरदार स्वागत होतय. पण किताब जिंकल्यानंतर तीन दिवसातच टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अडचणीत आलाय. पुण्याच्या एका वकिलाने हार्दिकवर राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्या विरोधात पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. स्थानिक वकिल वाजिद खान यांनी हार्दिक विरोधात तक्रार नोंदवली आहे. हार्दिक पंड्याने मॅच संपल्यानंतर सेलिब्रेशन करताना राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अपमान केला असा आरोप केला आहे. हार्दिकने राष्ट्रीय ध्वजाला आपल्या शरीरभोवती गुंडाळलं होतं. त्याच्यासोबत त्याची सहकारी मैत्रीण सुद्धा स्टेजवर झोपलेली असं तक्रारीत वकिलाने म्हटलं आहे.
पोलिसांनी सध्या तरी FIR नोंदवलेला नाही
तक्रारदाराने हार्दिक पंड्या विरोधात FIR नोंदवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करणं प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी सध्या तरी FIR नोंदवलेला नाही. पण तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे. या प्रकरणात चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे.
त्यांनी परस्परांना मिठी मारली
फायनल मॅच संपल्यानंतरची ही घटना आहे. त्यावेळी पुरस्कारांचं वितरण झालेलं होतं. सर्व खेळाडू आपपाल्या कुटुंबांसह मैदानावर विजयाचं सेलिब्रेशन करत होते. हार्दिकसोबत निळ्या ड्रेसमध्ये त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा होती. तिच्यासोबतच तो पूर्णवेळ मैदानात फिरत होता. त्यांनी परस्परांना मिठी मारली. किस केलं. सहकारी खेळाडूंसोबत डान्सही केला. या दरम्यान हार्दिक आणि माहिका ट्रॉफी असलेल्या पोडियमवर काहीवेळ एकत्र बसलेले. त्यावेळी हार्दिकने आपल्या शरीराभोवती तिरंगा गुंडाळलेला. त्यानंतर काही सेकंद दोघे पोडियमवर झोपले. त्यावरुन आता तक्रार नोंदवण्यात आली आहे.