
भारतीय महिला क्रिकेट टीमची फिरकीपटू राधा यादवने धमाकेदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात राधा यादवने हा विक्रम केला आहे. राधाने टी 20 क्रिकेटमध्ये सलग 25 डावांमध्ये किमान 1 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

इतकच नाही तर राधाने टी 20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. राधाने आपल्याच गोलंदाजीवर आफ्रिकेच्या लिजेलचा झेल घेतला. यासह तिने 50 विकेट्सचा आकडा पूर्ण केला. राधाने 36 व्या सामन्यात ही कामगिरी केली. राधा कमी वयात 50 विकेट्स घेणारी तिसरी युवा महिला गोलंदाज ठरली आहे. राधाने 20 वर्ष 334 व्या दिवशी हा कारनामा केला आहे.

बांगलादेशच्या नाहिदा अख्तरच्या नावे सर्वात कमी वयात टी 20 मध्ये 50 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. नाहिदाने वयाच्या 20 वर्षी ही कामगिरी केली होती. नाहिदाने 41 सामन्यात 50 फलंदाजांना बाद केलं आहे.

याबाबतीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोफीने 20 वर्ष 300 व्या दिवशी ही कामगिरी केली होती. सोफीने आतापर्यंत एकूण 42 मॅचमध्ये 61 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच राधा टीम इंडियाकडून 50 विकेट्स घेणारी पाचवी बोलर आहे.. भारताकडून आतापर्यंत पूनम यादवने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. पूनमने 95 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर झूलन गोस्वामी (56), एकता बिष्ट (53) आणि दीप्ती शर्मा (53) यांनीही कामगिरी केली आहे.