Sunil Gavaskar : त्याला पाहून असं वाटतं होतं की तो..संजू सॅमसन बद्दल बोलताना सुनील गावस्कर काय म्हणाले?
Sunil Gavaskar : टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने काल उपांत्यफेरीत बलाढ्य इंग्लंडला 7 धावांनी नमवलं. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. सुनील गावस्कर यांनी भारताच्या विजयाचं कसं विश्लेषण केलय?

वेस्ट इंडिज प्रमाणे इंग्लंड विरुद्ध सुद्धा संजू सॅमसनची बॅट तळपली. सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्यात संजूने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याच्या या खेळाचं भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भरभरुन कौतुक केलय. संजू सॅमसनकडे पाहून असं वाटतं होतं की, तो कुठल्या दुसऱ्या ग्रहावर बॅटिंग करतोय असं सुनील गावस्कर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. संजू सॅमसनने 42 चेंडूत 89 धावा फटकावल्या. त्यामुळे टीम इंडियाला 7 बाद 253 धावांपर्यंत मजल मारता आली. वानखेडे स्टेडियमवर काल हा सामना झाला. टीम इंडियाने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. आता न्यूझीलंड विरुद्ध रविवारी फायनल होईल. सामन्यानंतर बोलताना गावस्कर यांनी संजूच्या खेळाचं कौतुक केलं.
“तो वेगळ्या ग्रहावर फलंदाजी करत होता, असं तुम्ही म्हणू शकता. त्याला ग्रहासारखाच चेंडू मोठा दिसत असावा. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी स्पष्ट होत्या. त्याचा स्ट्रोक प्ले उत्तम होता. ड्राईव्हचे फटके मैदानालगत जात होते. कट आणि पुलचे शॉट त्याने उत्तम मारले. त्याने सुंदर, कलात्मक फलंदाजीचं प्रदर्शन केलं” असं सुनील गावस्कर संजू सॅमसनच्या खेळीच कौतुक करताना म्हणाले.
असे शॉट क्वचित दिसले असतील
“टी20 क्रिकेटमध्ये बरेच क्रॉस बॅटचे फटके पहायला मिळतात. फलंदाजीची शुद्धता क्वचित पहायला मिळते. स्लॉग आणि चाबकासारखे फटके जास्त दिसतात. पण संजूच्या बॅटिंगमध्ये तुम्हाला असे शॉट क्वचित दिसले असतील. कोलकातामध्ये अशीच फलंदाजी पहायला मिळाली आणि इथे सुद्धा तशीच फलंदाजी होती” असं सुनील गावस्कर म्हणाले.
त्या दोघांनी गावस्करांचा विश्वास सार्थ ठरवला
या मॅचआधी सुनील गावस्कर यांनी दोन खेळाडूंबद्दल विश्वास व्यक्त केला होता. त्यांनी इंग्लंड विरूद्धच्या महत्वाच्या सामन्यात तशीच कामगिरी केली. एक म्हणजे जसप्रीत बुमराह आणि दुसरा होता तिलक वर्मा. बुमरहाने काल मोक्याच्या क्षणी चांगली ओव्हर टाकून इंग्लंडच्या धावगतीला लगाम घातला तेच तिलक वर्माने तिलक वर्माने 7 चेंडूत 21 धावा चोपल्या. या दोघांची कामगिरी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरली. त्यामुळे सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरला.
