IND vs USA: सूर्यकुमार यादवची झुंजार अर्धशतकी खेळी, विक्रमी यादीत मिळवलं स्थान
भारत आणि अमेरिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यात भारताची अक्षरश: पडझड झाली. सूर्यकुमार वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अमेरिकेने भारतीय फलंदाजांची वाट रोखली.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात भारत आणि अमेरिका हे संघ सामने आले आहेत. या सामन्यात भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 161 धावा केल्या. या धावसंख्येत सूर्यकुमार यादवची खेळी महत्त्वाची ठरली. एका बाजूने धडाधड विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने खिंड लढवली. कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. एकीकडे भारत 100 धावा करेल की नाही अशी स्थिती होती. अशा तणावपूर्ण स्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडियाला सावरलं. 12.4 षटकात 77 धावांवर टीम इंडियाचे 6 गडी तंबूत होते. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण सूर्यकुमार यादव मैदानात होता आणि त्याने धावसंख्येच्या बाबतीत टीम इंडियाची लाज राखली. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकाराच्या मदतीने नाबाद 84 धावांची खेळी केली. अमेरिकेला 161 धावांचं आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. कारण चेंडू थांबून बॅटवर येत आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना फटकेबाजी करण्यास अडचण आली. पण अशा स्थितीतही सूर्यकुमार उभा राहिला आणि संघाला धावसंख्येच्या बाबतीत तारलं.
सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तसं पाहिलं तर सूर्याच्या स्ट्राईक रेटच्या तुलनेत त्याने जास्त चेंडू खेळला. पण खेळपट्टी पाहता त्याची खेळी ही सर्वोत्तम होती. त्याने अर्धशतक करण्यासाठी 7 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीला चौथा गिअर टाकला शेवटच्या काही षटकात झटपट धावा केल्या. टी20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा कर्णधार भूषविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादवने दुसरं स्थान पटकावलं आहे. त्याने नाबाद 84 धावांची खेळी केली. या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. त्याने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 88 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर बाबर आझम असून त्याने भारताविरूद्ध नाबाद 68 धावा केल्या होत्या.
सूर्यकुमार यादवने या अर्धशतकी खेळीसह खास यादीत स्थान मिळवलं आहे. भारताकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतक ठोकणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी हा कारनामा केला होता. विराट कोहलीने एकदा आणि रोहित शर्माने चार वेळा अर्धशतक ठोकलं आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करणारा पहिला कर्णधार ठरला आहे.
