Hardik Pandya : टीम इंडियाला लागोपाठ दुसरा झटका? विराट नंतर हार्दिक पांड्याचाही पत्ता होणार कट? मोठं कारण समोर
India T20 Squad, Hardik Pandya : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला टी-20संघातून वगळलं जाऊ शकतं. पांड्याला वगळण्यामागे दुखापत किंवा कामगिरी हे कारण नाही, तर त्यामागे एक अधिक गंभीर हेतू आहे.

Hardik Pandya, India Squad : आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड 6 जून रोजी होणार आहे. मात्र यावेळी टीम इंडियाला मोठा झटका बसू शकतो. मात्र, या दौऱ्यांसाठी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची निवड होण्याची शक्यता कमी दिसते. हार्दिक पांड्याला टी-20 संघातून वगळलं जाऊ शकतं. त्याला टी-20 संघातून वगळण्यामागे भारतीय निवडकर्त्यांचा हेतू वनडे वर्ल्डकपशी संबंधित आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत खेळणार असून, तेथील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. त्यामुळे, पांड्याला शक्य तितक्या जास्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळवण्यावर निवड समितीचं लक्ष केंद्रित आहे.
हार्दिक टी-20 संघातून का होणार बाहेर ?
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे. या एकदिवसीय मालिकेत संपूर्ण लक्ष हार्दिक आणि त्याच्या कामगिरीवर असेल. हार्दिक पांड्याच्या फलंदाजीच्या कामगिरीवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो त्याच्या कोट्यातील पूर्ण 10 ओव्हर्स षटके टाकू शकतो की नाही यावर निवड समितीचं बारकाईने लक्ष असेल. त्याला दुखापतीपासून वाचवत 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयार करण्याचे भारतीय निवड समितीचं ध्येय आहे.
हार्दिक पंड्या आणि दुखापती
हार्दिक पांड्यासाठी दुखापती ही एक मोठी डोकेदुखी ठरते. आयपीएल 2026 दरम्यान त्याला पाठीच्या दुखण्याचा त्रास झाला, ज्यामुळे त्याला साखळी फेरीतील चार ते पाच सामने गमवावे लागले. दुखापतीमुळे आयपीएल 2026 पूर्वीही तो अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि मालिकांना मुकला होता. आशिया कप 2025 स्पर्धेच्या मध्यातूनच हार्दिक पांड्याला माघार घ्यावी लागली. त्याच दुखापतीतून सावरू न शकल्यामुळे आशिया कप 2025 नंतर होणारा ऑस्ट्रेलिया दौराही त्याला गमवावा लागला.
पुनरागमन करत जिंकवला T20 वर्ल्डकप
मात्र, आशिया कप 2025 मध्ये झालेल्या दुखापतीतून परतल्यानंतर, हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. टी-20 वर्ल्डकपच्या नऊ डावांमध्ये हार्दिक पांड्याने 160.74 च्या स्ट्राईक रेटने 217 धावा केल्या. त्याने गोलंदाजी करताना नऊ बळीही टिपले.
हार्दिकच्या जागी कोणता खेळाडू ?
2026 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताला विजय मिळवून दिल्यानंतर, हार्दिक पांड्याला आयपीएल 2026 दरम्यान पुन्हा दुखापत झाली आणि तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. 2027 चा एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून, निवड समिती हार्दिकला टी-20 क्रिकेटपासून दूर ठेवणार आहे. त्यामुळेच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये त्याचा सहभाग होण्याची शक्यता कमी आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत, शिवम दुबे आणि नितीश रेड्डी यांचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठीच्या टी-20 संघात अष्टपैलू म्हणून समावेश केला जाऊ शकतो.