Jasprit Bumrah : बुमराह हिरोचा झीरो का झाला? त्याची गोलंदाजी का चालत नाहीय? त्यामागचं खरं कारण आलं समोर
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा, मुंबई इंडियन्सचा हिरो गोलंदाज आहे. पण बुमराह आता हिरोचा झीरो झालाय. त्याला एक विकेट मिळत नाहीय. बुमराहवर अशी वेळ का आलीय? त्यामागची कारणं काय आहेत? समजून घ्या.

Jasprit Bumrah In IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा आयपीएल 2026 मध्ये संघर्ष सुरु आहे. त्याला विकेट मिळत नाहीय. टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत पाच सामने झालेत. पण बुमराहला एकही विकेट मिळालेला नाही. करिअरमध्ये प्रथमच बुमराह सुद्धा अशा विकेटलेस स्थितीचा सामना करत असावा. बुमराह आणि मुंबई इंडियन्सचे चाहते हैराण झालेत. त्याला विकेट का मिळत नाहीय?. मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा हिरो असलेला जसप्रीत बुमराह या सीजनमध्ये टीमसाठी झीरो ठरतोय. त्याला ना विकेट मिळतायत, ना तो धावगतीला लगाम घालू शकतोय. बुमराहचा फॉर्म हा टीम मॅनेजमेंटसाठी सर्वात जास्त टेन्शनचा विषय बनला आहे.
आयपीएल 2026 मध्ये बुमराहने आतापर्यंत पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गोलंदाजी केली आहे. या पाच सामन्यात त्याने 8.63 च्या इकॉनमी रेटने 164 धावा दिल्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये तो सरासरी 8 ते 9 धावा देतोय. आयपीएलमध्ये हाय स्कोरिंग मॅचेस होतात. तिथे गोलंदाजीची ही इकॉनमी वाईट नाहीय. पण बुमराह सारख्या स्ट्राइक बॉलरकडून नेहमीच विकेट्सची जास्त अपेक्षा असते.
त्याची ही कामगिरी एक डाग म्हणतो तशी
बुमराहचं क्रिकेटमध्ये आतापर्यंत शानदार करिअर राहिलं आहे. त्या तुलनेत आयपीएलमधील सध्याची त्याची ही कामगिरी एक डाग म्हणतो तशी आहे. सामन्याची दिशा बदलणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण सध्या फलंदाज त्याची गोलंदाजी सहजतेने खेळतायत. बुमराहच्या या फॉर्ममुळे मुंबई इंडियन्सचा सुद्धा संघर्ष सुरु आहे. टीमला सलग चार पराभवांचा सामना करावा लागलाय. पॉइंट्स टेबलमध्ये तो नवव्या स्थानावर आहे.
क्षमतेवर परिणाम झालाय
आधीपेक्षा फलंदाज आता बुमराहची गोलंदाजी जास्त आक्रमकतेने आणि आत्मविश्वासाने खेळतायत. बुमराहचा नाव ऐकताच आधी फलंदाज घाबरायचे. मोठे शॉट्स खेळणं टाळायचे. तेच फलंदाज आता बिनधास्त, आरामात बॅटिंग करतायत. बुमराहची गोलंदाजी खेळताना बॅटिंग अप्रोचमधील फरक सहज दिसून येतोय. त्यामुळे बुमराहच्या विकेट घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झालाय.
बुमराहच्या गोलंदाजीत काय बदल झालाय?
बुमराहच्या गोलंदाजीत आता एक बदल पहायला मिळतोय. त्याच्या गोलंदाजीत आता स्लोअर चेंडूंचा जास्त वापर होतोय. या सीजनमध्ये त्याने आतापर्यंत 44 टक्के स्लोअर चेंडू टाकलेत. त्याच्या गोलंदाजीची गती कमी होऊन 130 किलोमीटर प्रतितास झाली आहे. अशा स्लोअर चेंडूसाठी फलंदाज आधीपासूनच तयार असतात. त्याने जास्त गतीने चेंडू टाकले, तर स्लोअर वन अजून प्रभावी होईल.