Womens Hockey World Cup: भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेला 6-1 ने चिरडलं! सलग 11व्या विजयाची नोंद
वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली. भारताने दक्षिण अफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा उडवला. या विजयासह भारताने दक्षिण अफ्रिकेवर सलग 11वा विजय मिळवला आहे.

वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने दमदार सुरूवात केली. पहिल्या सामन्यात चीनला 2-2 ने बरोबरीत रोखलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा उडवला आहे. या विजयासह भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेपासून भारताने दक्षिण् अफ्रिकेला विजयाची संधीच दिली नाही. भारताला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सलग 11 वा विजय आहे. या विजयामुळे भारतीय महिला संघाच्या पुढच्या फेरीच्या आशा भक्कम झाल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने सुरूवातीपासूनच पकड मिळवली होती. 11 व्या मिनिटाला सुनेलिता टोप्पोने मैदानी गोल मारला आणि दक्षिण अफ्रिकेवर दबाव वाढण्यास सुरूवात केली. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्वॉर्टरमध्ये दे दणादण गोल मारले.
हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या क्वॉर्टरमध्ये 1 गोलची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरमध्येही भारतीय संघाने आक्रमक खेळ दाखवला. नवनीत कौर आणि पुखऱमबम यांनी प्रत्येकी एक गोल मारत ही आघाडी 3-0 वर नेली. त्यानंतर तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारतीय संघाने आणखी दोन मारत दक्षिण अफ्रिकेला पूर्णत: बॅकफूटवर ढकललं. त्यानंतर शेवटच्या सत्रात भारताने आणखी एक गोल मारला आणि 6-0 अशी आघाडी घेतली. सामना संपण्यासाठी काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना दक्षिण अफ्रिकेला एक गोल मारण्यात यश आलं. त्यामुळे सामन्याचा शेवट 6-1 असा झाला. भारताच्या या कामगिरीमुळे वर्ल्डकपच्या आशा उंचावल्या आहेत.
𝗪𝗵𝗮𝘁 𝗮 𝗵𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝗶𝗰 𝘀𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁 𝗳𝗿𝗼𝗺 𝘁𝗵𝗲 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗪𝗼𝗺𝗲𝗻’𝘀 𝗧𝗲𝗮𝗺! 🔥
India put on a dominant show to beat South Africa 6-1 and climb to the top of Pool D at the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026. 🏑💪
A big win. A big… pic.twitter.com/eTaG332IQO
— Hockey India (@TheHockeyIndia) August 18, 2026
हॉकी वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात झाल्यापासून भारताला कधीही यश मिळालेलं नाही. भारताने शेवटचं 1974 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या पहिल्या वुमन्स हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. तेव्हा उपांत्य फेरी गाठली, पण अर्जेंटीनाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर कधीच चांगली कामगिरी दिसली नाही. मागच्या वर्षी 2022 मध्ये स्पेन नेदरलँडमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ नवव्या स्थानावर राहिला. त्यामुळे भारतीय संघाने यंदा केलेल्या कामगिरीच्या जोरावर क्रीडाप्रेमींच्या आशा वाढल्या आहे. भारताचा पुढचा सामना 20 ऑगस्ट रोजी इंग्लंडशी होणार आहे.
