टिकटॉक आणि हेलो App वर बंदीची शक्यता, सरकारकडून नोटीस जारी

| Updated on: Jul 18, 2019 | 4:22 PM

योग्य उत्तरं न मिळाल्यास भारतात दोन्ही App वर बंदी घातली जाऊ शकते. यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका संघटनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून टिकटॉक आणि हेलोवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

टिकटॉक आणि हेलो App वर बंदीची शक्यता, सरकारकडून नोटीस जारी
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडियावर व्हिडीओंचा धुमाकूळ माजवणारं TikTok App चालवणाऱ्या कंपनीला नोटीस पाठवली आहे. यासोबतच हेलो App लाही नोटीस पाठवत दोन्ही कंपन्यांकडून 21 प्रश्नांची उत्तरं मागवण्यात आली आहेत. योग्य उत्तरं न मिळाल्यास भारतात दोन्ही App वर बंदी घातली जाऊ शकते. यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका संघटनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून टिकटॉक आणि हेलोवर बंदी घालण्याची मागणी केली होती. हे दोन्ही Apps देशविरोधी कृत्यांचा अड्डा बनले असल्याचा दावा या मागणीद्वारे करण्यात आला होता.

स्वदेश जागरण मंचने मोदींना पत्र लिहिल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने App चालवणाऱ्या कंपन्यांना नोटीस जारी केली. भारतीय तरुण या App मुळे वेगळ्याच दिशेने जात असल्याचं स्वदेशी जागरण मंचने म्हटलं होतं. तर टिकटॉकने पुढच्या तीन वर्षात भारतामध्ये 100 कोटी डॉलर गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलंय, ज्याद्वारे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानावर भर दिला जाईल.

दरम्यान, यापूर्वी एप्रिलमध्ये मद्रास हायकोर्टाच्या मदुरै खंडपीठाने केंद्र सरकारला टिकटॉक App ची डाऊनलोडिंग बंद करण्याचा आदेश दिला होता. शिवाय टिकटॉक व्हिडीओ फेसबुकला शेअर करण्याचा ऑप्शन बंद करण्यात यावा असंही म्हटलं होतं. मुलांना सायबर क्राईमपासून वाचवण्यासाठी सरकार काही कायदा आणणार आहे का, अशीही विचारणा कोर्टाने केली होती.

राज्यसभेत स्मार्ट टीव्ही प्रकरणही गाजलं

राज्यसभेत भाजप खासदार अमर शंकर यांनी स्मार्ट टीव्ही हॅकिंग प्रकरणही लावून धरलं. या घटनांविरोधात सरकारने कठोर पाऊल उचलावं, अशी मागणी त्यांनी केली. स्मार्ट टीव्ही हॅक करुन त्याद्वारे व्हिडीओ बनवले जात असल्याचं अमर शंकर यांनी सांगितलं. हॅकर्सने स्मार्ट टीव्ही हॅक करुन एका जोडप्याचा वैयक्तिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. लोकांच्या प्रायवसीसंदर्भात ही तडजोड होत असल्याचं अमर शंकर यांनी म्हटलंय. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनीही हा मुद्दा गंभीर असल्याचं म्हटलंय.