Unwanted Call : नकोशा कॉलला लागेल लगाम! TRAI ने उचलले कडक पाऊल

| Updated on: Feb 18, 2023 | 9:46 PM

Unwanted Call : दिवसभरात कंपन्यांच्या कॉलमुळे डोके भणभणते. रोजच ही स्कीम, नको त्या योजनांनी डोके उठल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे या कंपन्यांविरोधात नागरिकांमध्ये रोष होता. आता या कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी ट्रायने कडक पाऊल उचलले आहे.

Unwanted Call : नकोशा कॉलला लागेल लगाम! TRAI ने उचलले कडक पाऊल
कडक कारवाई
Follow us on

नवी दिल्ली :  तुम्ही पण मोबाईलवर येणाऱ्या टेलिमार्केटिंग कंपन्यांच्या (Tell Marketing Company) कॉलमुळे हैराण आहात का? दिवसभरात या कंपन्यांच्या कॉलमुळे डोके भणभणते. रोजच ही स्कीम, नको त्या योजनांनी डोके उठल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे या कंपन्यांविरोधात नागरिकांमध्ये रोष होता. आता या कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी ट्रायने कडक पाऊल उचलले आहे. टेलिकॉम नियामक ट्रायने त्यासाठी कडक पाऊले टाकण्याची घोषणा केली आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सला म्हणजे मोबाईल कंपन्यांना कॉल्स आणि एसएमएसवर रोख लावण्यास सांगितले आहे. त्यासाठी ट्रायने मार्गदर्शक तत्वे (TRAI Guidelines) जाहीर केली आहेत.  त्यानुसार एका महिन्यात याविषयीची कारवाई टेलिकॉम कंपन्यांना करावी लागणार आहे.

मनी9 च्या अहवालानुसार, नकोशा कॉल्स आणि एसएमएस रोखण्यासाठी टेलिकॉम नियामक, ट्रायने टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांचे कान टोचले आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांवर कडक पाऊले टाकावीत असे निर्देश ट्रायने टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. ट्रायने खासगी क्रमांकावरुन कॉल करणाऱ्या टेलिमार्केटिंग कंपन्यांवरही कारवाईचे निर्देश दिले आहेत.

टेलिमार्केटिंग कंपन्यांनी ग्राहकांचे अक्षरशः डोके उठविले आहे. केव्हाही या कंपन्या त्यांच्या मार्केटिंगसाठी ग्राहकांना फोन करतात. विशेष म्हणजे ग्राहकांनी नकार दिल्यावरही त्यांच्या कॉलमध्ये खंड पडत नाही. एका सर्वेक्षणानुसार, प्रत्येक तीन भारतीयांमागे दोघांना रोज तीन वा त्यापेक्षा अधिक असे कॉल येतात. त्यातील 50 टक्के कॉल खासगी क्रमांकावरुन येत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

एका स्थानिक सर्वेक्षणात सहभागी 45 टक्के लोकांनी दररोज सरासरी 3-5 कॉल डोकं उठवितात, असे म्हटले आहे. तर 16 टक्के लोकांनी त्यांना प्रत्येक दिवशी 6-10 टेलिमार्केटिंग कंपन्या कॉल करत असल्याचा दावा केला आहे. 5 टक्के लोकांचा दावा आहे की, प्रत्येक दिवशी त्यांना टेलिमार्केटिंग कंपन्यांचे 10 हून अधिक कॉल येतात. या सर्वेक्षणात सहभागी सर्वच लोकांनी कंपन्यांच्या नकोशा कॉलमुळे त्रस्त असल्याचा दावा केला आहे.

ग्राहकांना येणाऱ्या कॉलमध्ये 60 टक्के कॉल आर्थिक सेवांच्या विक्रीसंबंधीतील असतात. 18 टक्के कॉल संपत्ती, मालमत्तांच्या विक्रीसंबंधीचे असतात. तर 10 टक्के कॉल नोकरी, कमाईच्या संधीबाबत असतात. सर्वेक्षणानुसार, ट्राय आणि ऑपरेटरच्या प्रयत्नांना अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडत आहे. खासगी क्रमांकावरुन कॉल करुन टेलिमार्केटिंग कंपन्या ट्रायच्या नियमांना हरताळ फासत असून त्या रडारवरही येत नसल्याचे दिसत आहे.

  1. ट्रायने पुन्हा नव्याने दिले टेलिकॉम कंपन्यांना निर्देश
  2. टेलिमार्केटिंग कंपन्यांविरोधात कडक पाऊले टाकण्याचा निर्धार
  3. नोंदणी नसलेल्या कंपन्यांविरोधात अगोदर कारवाई होणार
  4. खासगी मोबाईल क्रमांकावरुन कॉल करणाऱ्या कंपन्या रडारवर
  5. एसएमएस पाठविणाऱ्या टेलिमार्केटिंग कंपन्यांची तपासणी करण्यात येणार
  6. नव्या निर्देशांचे टेलिकॉम कंपन्यांना एका महिन्यात पालन करावे लागणार