‘आमच्या या मागण्या तुम्ही मान्य करा, मला राजकारणात…’, काय म्हणाले मनोज जरांगे
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची आज सरकारच्या शिष्ठमंडळाने भेट घेतली आहे. या शिष्ठमंडळात चार ते पाच आमदारांचा समावेश होता. आमच्या सात ते आठ मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. आता सरकारने त्यावर निर्णय घ्यावा असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अलिकडेच मराठवाडा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत डॉक्टरांकडून उपचार घेण्यास प्राधान्य दिले. मनोज जरांगे यांची आज सत्ताधारी पक्षाच्या चार आमदारांनी भेट घेतली. त्यांच्यासमोर मनोज जरांगे यांनी आपल्या सर्व मागण्या ठेवल्या आहेत. ‘सगेसोयरे’ या अध्यादेशाची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. आपण आपल्या म्हणजे आमच्या मराठा समाजाच्या सात ते आठ मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. मराठ्यांना राजकारणात पडायचे नाही, आम्ही जे करु ते समाजाला विचारुन करु. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्हाला राजकारणात यायची गरजच नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

