Eknath Shinde News : शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात योजनांच्या निधीची तरतूद नाही
Anandacha Shidha, Shivbhojan Thali Scheme : शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, तीर्थ दर्शन योजना या तत्कालीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजनांना कोणताही निधी या अर्थसंकल्पत देण्यात आलेला नाही, त्यामुळे विरोधकांकडून यावर कडाडून टीका होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू करण्यात आलेल्या ‘आनंदाचा शिधा’ या योजनेला आता कात्री लावण्यात आलेली आहे. काल अजित पवार यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. शिव भोजन आणि जेष्ठ नागरिकांच्या तीर्थ दर्शन योजनेला देखील निधी देण्यात आलेला नाही.
या योजना बंद केल्याचा आरोप करत विरोधकांनी आता सरकारवर हल्ला बोल केला आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या काळात आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे. कात्री लावलेली नाही तर सरळ योजना बंदच केल्या आहेत. आनंदाचा शिधा संपला आहे. निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला, अशी खोचक टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर शिंदे सरकारच्या काळात आणलेल्या योजनांचं नाव अर्थसंकल्पात न घेतल्याने या योजना अप्रत्यक्षपणे बंदच केल्याचं रोहित पवार यांनी म्हंटलं आहे. नाहीतर त्यांच्यात अंतर्गत कुरघोड्या असल्याने या योजना फक्त एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्यामुळे बंद करायच्या असं अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून घेतला असेल, असा टोला देखील रोहित पवारांनी लगावला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील यावर टीका केली आहे.