दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा
काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि ठाण्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबईत तर काहींच्या घरात पाणी शिरलं आहे. सर्वत्र दाणादाण उडाल्याचं चित्र आहे. मुंबई आणि ठाण्यात लोकल ट्रॅकवरच पाणी आल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे बदलापूर ते ठाणेपर्यंतच लोकल सोडली जात आहे.
राज्यात पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. सर्वत्र धुवांधार पाऊस बरसत आहे. कोकणात तर पावसाने धुमशान घातलं आहे. ठाणे जिल्ह्यातही रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने बदलापूर आणि सीएसएमटी दरम्यानच्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे फक्त ठाण्यापर्यंत चालवल्या जात आहेत. त्याचा फटका चाकरमान्यांना चांगलाच बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिशी ट्रेन बंद झाल्याने कामावर जाणं मुश्किल झालं आहे. ठाण्यापासून ते मुंबईपर्यंतच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. लोकलची वाट पाहत प्रवासी प्रचंड वैतागले आहेत.
Latest Videos
Latest News