tv9 Marathi Special Report | गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
देशात गॅस सिलेंडर आणि इंधनाच्या संभाव्य तुटवड्याचा मुद्दा आता लोकसभेतही गाजू लागला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली. अमेरिकेशी झालेल्या तडजोडींमुळे देशात अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
देशात गॅस सिलेंडर आणि इंधनाच्या संभाव्य तुटवड्याचा मुद्दा आता लोकसभेतही गाजू लागला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली. अमेरिकेशी झालेल्या तडजोडींमुळे देशात अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. या मुद्द्यावरून लोकसभेत राहुल गांधी आणि सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात काही काळ शाब्दिक चकमकही झाली. राहुल गांधी यांनी गॅस सिलेंडर आणि इंधनाच्या तुटवड्यावरून सरकारला घेरताना युद्धजन्य परिस्थितीची झळ भारतालाही बसू लागल्याचा दावा केला. तसेच एलपीजीच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद पडू लागल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सरकारची बाजू मांडताना देशात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच देशांतर्गत एलपीजी उत्पादनात सुमारे 28 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर निशाणा साधला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या देशातून तेल खरेदी करायचे याबाबत दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही कागदपत्रांचा दाखला देत मंत्री पुरी यांच्या कुटुंबीयांबाबतही गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सभागृहात केले. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे लोकसभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

