गव्हाचा पेरा झाला अन् ग्राहकही ठरले, औरंगाबादमध्ये अनोखा उपक्रम

| Updated on: Nov 16, 2021 | 4:34 PM

शेतातला माल बाजारपेठेत दाखल होईपर्यंत त्याचा दर शेतकऱ्यांना ठरवता येत नाही. मग पेरणी झाली की, दर कसा ठरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा भन्नाट उपक्रम असाच आहे. होय 'उत्पादक ते ग्राहक' या तत्वावर जिल्ह्यातील सेंद्रिय गहू उत्पादक शेतकरी व ग्राहक म्हणून जिल्हा परिषदेत काम करणारे अधिकारी-कर्मचारी हे राहणार आहेत.

गव्हाचा पेरा झाला अन् ग्राहकही ठरले, औरंगाबादमध्ये अनोखा उपक्रम
बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू या मुख्य पिकावरही तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
Follow us on

औरंगाबाद : शेतातला माल बाजारपेठेत दाखल होईपर्यंत त्याचा दर शेतकऱ्यांना ठरवता येत नाही. मग पेरणी झाली की, दर कसा ठरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण (Aurangabad Zilla Parishad) औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा भन्नाट उपक्रम असाच आहे. होय ‘उत्पादक ते ग्राहक’ या तत्वावर जिल्ह्यातील सेंद्रिय गहू उत्पादक शेतकरी व ग्राहक म्हणून जिल्हा परिषदेत काम करणारे अधिकारी-कर्मचारी हे राहणार आहेत. मात्र, अट एकच आहे की हा गहू विषमुक्त असला पाहिजे. एवढ्या अटीचे पालन केले की, शेतकऱ्यांच्या गव्हाचा दरही ठरला आहे.

शेतीमालाला गरज असते ती योग्य बाजारपेठेची आणि ग्राहकाची मागणी असते ती दर्जात्मक मालाची. दोन्ही घटकांची नेमकी हीच गरज ओळखून औरंगाबादमध्ये विषमुक्त गहू अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले जाणार आहे.

विषमुक्त गहू अभियानात जे शेतकरी सहभाग नोंदविणार आहेत. त्यांनी सेंद्रिय पध्दतीनेचे गव्हाची जोपासना करणे आवश्यक आहे. त्यामुळे पेरणीपासून काढणीपर्यंतच्या सर्व टप्यावर कृषी विभागामार्फत पर्यवेक्षण करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर जि.प. पदाधिकारी, अधिकारी व पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा सहभाग असणारी जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती कार्यरत राहणार आहे.

काय आहेत अटी

* पीक पेरणीपासून ते पीक वाढीच्या दरम्यान कोणत्याही टप्प्यावर रासायनिक खत व रासायनिक किटकनाशके, बुरशीनाशके वा तणनाशकांचा वापर करण्यास परवानगी असणार नाही.
* उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादीत केलेला गहू हा सेंद्रिय असल्याची हमी कृषी विभागामार्फत ग्राहकांना द्यावी लागणार आहे.
* अभियान उत्पादित गहू हा सेंद्रीय शेती पध्दतींचा अवलंब करून पिकविलेला आहे, याचे प्रमाणीकरण करण्यासाठी तालुकास्तरावर समिती नियुक्त करण्यात येईल .
* शेतकऱ्यांनी तालुका मुख्यालयात ग्राहकांच्या मागणीनुसार स्वखर्चाने गहू पोहच करणे बंधनकारक आहे.
* गव्हाची किंमत ही दर कमाल 3500 रुपये प्रतिक्विंटल राहणार आहे.
* अभियानात सहभागी होणासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत राहील.

अभियानात सहभाग कसा नोंदवायचा

* या अनोख्या अभियानात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
* शेतकऱ्यांनी गव्हाचा जीडब्लू 496 वाणाची लागवड करणे आवश्यक आहे.
* बियाणे व इतर लागवड खर्च हा शेतकऱ्यांनीच करायचा आहे.
* शेतकऱ्यांनी किमान एक एक्करमध्ये सेंद्रिय पध्दतीने गव्हाची लागवड करणे गरजेचे आहे.
* जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी सामजस्य करार करणे गरजेचे आहे.

दुहेरी उद्देश साध्य

सेंद्रिय पध्दतीने गव्हाची लागवड कमी होत आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पध्दतीने लागवड करावी व शेतीमालाला योग्य दर मिळावा हा उद्देश समोर ठेऊन हे अनोखे अभियान घेतले जाणार आहे. त्यामुळे यामध्ये शेतकरीही सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

नंदुरबारमध्ये लाल मिरचीचा ‘ठसका’, उत्पादन घटले दर मात्र वाढले

मराठवाड्यात कापसाचे क्षेत्रही घटले अन् उत्पादनही, काय आहेत कारणे..?

गरोदर गायीसाठी डोहाळजेवण आंध्रप्रदेशात जोपासली जातेय परंपरा