कांद्याने उत्पादकांच्या डोळ्यात आणले पाणी; कांदा उत्पादकांनी दिला हा इशारा

| Updated on: Feb 20, 2023 | 1:50 PM

येत्या आठ दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मालेगाव-नगर, नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील विंचूर चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

कांद्याने उत्पादकांच्या डोळ्यात आणले पाणी; कांदा उत्पादकांनी दिला हा इशारा
Follow us on

नाशिक : कांद्याच्या बाजारभावात घसरण (fall in prices) होत कांद्याचे (Onion) सरासरी बाजार भाव पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने येवला बाजार समितीत कांद्याचे लीलाव एक तास बंद पाडले. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत आहे. तसेच विदेशात कांद्याला मागणी नाही. त्यामुळे दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. येवला (Yewla) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीजास्त कांद्याला 732 रुपये, कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 500 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव आहे. साठ ते सत्तर हजार रुपये एकरी केलेला उत्पादन खर्च निघेनासा झालाय. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले.

तासाभरासाठी लीलाव पाडला बंद

कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादकांचा वाहतूक आणि मजुरी खर्च निघणार नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज राज्य व केंद्र सरकारपर्यंत पोच करण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कांद्याचे लिलाव एक तास बंद पाडले.

आंदोलनाचा दिला इशारा

येत्या आठ दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मालेगाव-नगर, नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील विंचूर चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. कांदा उत्पादक शेतकरी संतोष थळकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी संताप व्यक्त केला.

खर्च जास्त, उत्पन्न कमी

यंदा कांद्याच्या भावात घसरण होत आहे. आणलेले कांदे ५१६ रुपये या भावाने गेले. काढणीचा १५ हजार रुपये एकरी आणि लावणीचा १५ हजार रुपये एकरी असा ३० हजार रुपयांचा खर्च केला. खतांचा शिवाय वाहतूक व इतर खर्च वेगळा होता. एकरी ६० हजार रुपयांचा खर्च होतो. तुलनेत ४० हजार रुपयेही मिळणे शक्य नाही. त्यामुळं सरकारने याकडं लक्ष दिलं पाहिजे, असं कांदा उत्पादकांनी सांगितलं. उत्पादन खर्चानुसार कांद्याला भाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.