अर्थसंकल्पावरुन होणाऱ्या टीकेवर निर्मला सीतारमन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “महाराष्ट्राकडे…”

महाराष्ट्र राज्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद पाहायला मिळाली नाही. यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आता या टीकेला निर्मला सीतारमन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अर्थसंकल्पावरुन होणाऱ्या टीकेवर निर्मला सीतारमन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या महाराष्ट्राकडे...
| Updated on: Jul 24, 2024 | 2:19 PM

Nirmala Sitharaman Reaction On Opposition Allegation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरुण, रोजगार यांच्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांना झुकतं माप देण्यात आले. मात्र महाराष्ट्र राज्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद पाहायला मिळाली नाही. यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आता या टीकेला निर्मला सीतारमन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नुकतंच अर्थसंकल्पावर भाष्य केले. एखाद्या राज्याच्या नावाचा अर्थसंकल्पात उल्लेख नसेल तर अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांचा त्या राज्यांना लाभ होत नाही असं नाही, असे निर्मला सीतारमन यावेळी म्हणाल्या.

निर्मला सीतारमन यांची प्रतिक्रिया

“अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचं नाव घेता येईलच असं नाही. जूनमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाने वाढवण बंदराला मंजुरी दिली होती. या बंदरासाठी 76 हजार कोटीची मंजूरी दिली आहे. मात्र, फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. याचा अर्थ असा होत नाही की महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी दिला नाही किंवा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं जात आहे”, असे निर्मला सीतारमन यांनी म्हटले.

“एखाद्या राज्याच्या नावाचा उल्लेख अर्थसंकल्पात नसेल तरी अर्थसंकल्पात जाहीर होणाऱ्या योजनांचा लाभ हा सर्व राज्यांना मिळतो. राज्याचे नाव नसलेल्यांना योजनांचा लाभ मिळत नाही, असं होत नाही. अर्थ संकल्पातील योजनांचा समान लाभ सर्व राज्यांना मिळतो. त्यामुळे विरोधक अर्थसंकल्पाचा चुकीचा प्रचार करत आहेत”, असेही निर्मला सीतारमन यांनी सांगितले.

सीमा शुल्कात कपात

दरम्यान केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून कमी करण्यात आली. आता सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्के इतके कमी करण्यात आले आहे. कस्टम ड्युटीत अर्ध्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सराफा बाजारात आता पुन्हा चैतन्य दिसून येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us