सूटकेस ते लाल रंगाचं कापड, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवा ट्रेण्ड का आणला?

| Updated on: Feb 01, 2020 | 10:25 AM

लाल रंगाच्या कापडी पिशवीत गुंडाळलेली कागदपत्रं घेऊन निर्मला सीतारमण गेल्या वर्षी जेव्हा संसदेत पोहचल्या होत्या, तेव्हा हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. 

सूटकेस ते लाल रंगाचं कापड, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवा ट्रेण्ड का आणला?
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोणत्या वस्तू महागणार आणि कशाचे दर स्वस्त होणार? इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? सीतारमण यांच्या पोतडीतून रेल्वेसाठी काय मिळणार? याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले आहेत. अर्थसंकल्पाची कागदपत्रं पूर्वी ब्रिफकेसमधून नेली जायची, मात्र गेल्या वर्षीपासून लाल रंगाच्या कापडी पिशवीत (Budget Suitcase to Red Cloth Bag) आणली जातात.

निर्मला सीतारमण जेव्हा पारंपरिक सूटकेसला फाटा देत लाल रंगाच्या कापडी पिशवीत गुंडाळलेली कागदपत्रं घेऊन संसदेत पोहचल्या होत्या, तेव्हा हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता.

नरेंद्र मोदी सरकारमध्ये ‘सुटकेसची देवाणघेवाण’ होत नाही, हा संदेश देण्यासाठी अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत बदलण्यात आली. लेदर सूटकेसची जागा लाल कापडी पिशवीने घेतल्याचं निर्मला सीतारमण यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं.

मोदी सरकारने पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी निविदा प्रणालीचा विस्तार केला आहे. सूटकेस चामड्याची असल्याने मी वापरली नाही, अशी शंका कोणीतरी उपस्थित केली. यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यताही निर्माण झाली. पण मी इतका विचार केला नाही, असं सीतारमण यांनी स्पष्ट केलं होतं.

1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री झाल्या. मात्र निर्मला सीतारमन यांना पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरण्याचा मान मिळाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.

चिदंबरमनी नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला! सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारे अर्थमंत्री कोण?

2016 पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस बजेट सादर करण्याची प्रथा होती. मात्र तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 पासून एक फेब्रुवारीला बजेट सुरु करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे रेल्वे आणि सर्वसाधारण बजेट स्वतंत्रपणे मांडलं जात असे. परंतु आता दोन्ही बजेट एकत्रच सादर केली जातात.

बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, आर्थिक मंदी या मुद्द्यांवरुन विरोधक मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. सर्वसामान्यांकडूनही संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे बजेटमधून कोणाला दिलासा मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

नोकरदार, व्यावसायिक, महिलावर्ग, शेतकरी, पेन्शनधारक अशा सर्वाच वर्गाचं लक्ष आता निर्मला सीतारामण यांच्या पोतडीतून काय बाहेर पडणार, याकडे लागलं आहे. (Budget Suitcase to Red Cloth Bag)