भारत 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

| Updated on: Oct 29, 2020 | 10:34 AM

भारताची अर्थव्यवस्था वेगाने सुधारत आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. इकॉनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

भारत 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा
Follow us on

नवी दिल्ली: देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगानं सुधारत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. भारतात नुकतेच कामगार कायदा, कृषी कायदा आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जे बदल केले आहेत, त्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल पाहयला मिळतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्याचबरोबर देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मिळेल, त्यापासून कुणीही वंचित राहणार नसल्याचं मोदींनी या मुलाखतीत सांगितलं. (PM Narendra Modi interview to economic times on Indian Economy )

कोरोनाच्या महामारीमध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जे सुधारणावादी पाऊल उचललं आहे, त्यामुळं संपूर्ण देशाचं लक्ष भारताकडे लागलं आहे. जगभरातील देश भारताच्या बाजारातील ताकदीवर विश्वास व्यक्त करत आहेत, असा दावाही पंतप्रधान मोदींनी केला आहे. गुंतवणुकीसाठी भारताला जगभरातून पसंती मिळत आहे. भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असून, 2024 पर्यंत आम्ही ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा मोठा दावा पंतप्रधान मोदी यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे

1. कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे, म्हणजे आपण आनंदोत्सव साजरा करण्याची ही वेळ नाही. तर आपले आचरण आणि आपली व्यवस्था अजून मजबूत करण्याची ही वेळ आहे.

2. कोरोना महामारी नियंत्रणात ठेवणं हे आपलं लक्ष्य असायला हवं. आपल्याला लोकांना अजून जागृत करायचं आहे. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा पुरवठा करायचा आहे.

3. विविध क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मोठ्या सुधारणांची मागणी करत होते. अनेक राजकीय पक्षही सुधारणांच्या नावाखाली मत मागत होते. पण या सुधारणांचं श्रेय सरकारला मिळू नये यासाठी विरोधी पक्ष प्रयत्नशील आहेत.

4. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील कायदे योग्य होते. पण त्यात कामगार कायद्यात काही त्रुटी होत्या. कामगार कायद्याला आम्ही अधिक चांगले आणि सक्षम बनवले आहे.

5. देशातील कामगारांची स्थिती सुधारणार नाही तोपर्यंत देश विकसित होणार नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत आमच्या सरकारनं कृषी आणि कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे मोठे बदल निर्माण होतील.

6. भारत आर्थिक सुधारणांच्या उंबरठ्यावर आहे. कृषी क्षेत्रात आमच्या शेतकऱ्यांनी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आम्ही सर्वाधिक MSPने कृषीमाल खरेदी केला आहे. आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उत्पन्नावर भर देत आहोत.

संबंधित बातम्या:

प्रवासी मजुरांमुळे हळूहळू अर्थव्यवस्थाही रुळावर, घरी पैसे पाठवण्याचं प्रमाण वाढलं

भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये चीनला धोबीपछाड देणार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

मनमोहन सिंहांचा मोदी सरकारवर हल्ला, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तीन मार्ग दाखवले

PM Narendra Modi interview to economic times on Indian Economy