Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
Success Story : अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुषार तळवारे यांनी नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला नातेवाईकांनी त्यांच्या निर्णयाची खिल्ली उडवली, मात्र त्यांनी टीकेकडे दुर्लक्ष करून व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आज त्यांनी कोट्यवधी रुपयांची कंपनी उभी केली आहे. चला तर मग त्यांच्या या यशोगाथा बद्दल जाणून घेऊयात.

“अभियंता झाल्यावर नोकरी करायची, चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आणि स्थिर आयुष्य जगायचं…” असा सर्वसाधारण विचार अनेक तरुण करतात. मात्र काही जण पारंपरिक वाट सोडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतात. महाराष्ट्रातील तुषार तलवार यांनीही असाच धाडसी निर्णय घेतला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी नोकरीऐवजी भरडधान्यांच्या व्यवसायाची वाट निवडली. या निर्णयाची सुरुवातीला नातेवाईकांनी खिल्ली उडवली; मात्र तुषार यांनी टीकेकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.
योग्य संशोधन, सातत्यपूर्ण मेहनत आणि सरकारी योजनांचा प्रभावी वापर करत त्यांनी नाशिकमध्ये ‘फूडोनिक’ या कंपनीची स्थापना केली. आज कंपनीत 200 हून अधिक भरडधान्यांची उत्पादने आणि 100 हून अधिक प्रकारचे आरोग्यदायी खाखरे तयार केले जातात. विशेष म्हणजे, 2025-26 या आर्थिक वर्षात कंपनीने 2.5 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. नातेवाईकांच्या टोमण्यांपासून कोट्यवधींच्या व्यवसायापर्यंतचा तुषार तलवार यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. चला तर मग तुषार तलवार यांच्या यशाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.
बाजरीची कल्पना आली
तुषार तळवारे यांना लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड होती. घरातील मिक्सर आणि ग्राइंडर दुरुस्त करण्यापासून सुरू झालेली त्यांची आवड पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंत पोहोचली. २०१४ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नाशिकमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आणि त्यानंतर मुंबईतून बी.टेकची पदवी घेतली.
मात्र, महाविद्यालयीन काळात शैक्षणिक ताण आणि नैराश्यातून सावरताना त्यांचा इस्कॉनशी संपर्क आला. आश्रमातील आध्यात्मिक वातावरण आणि मार्गदर्शनामुळे त्यांच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला. याच काळात त्यांचे लक्ष भरडधान्यांकडे वळले.
पुढे ‘मिलेट मैन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. खादर वली यांच्या सत्रांमधून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी आपल्या केवळ 3,500 रुपयांच्या वैयक्तिक बचतीतून 30 किलो भरड धान्य खरेदी करून आपल्या या प्रवासाला सुरुवात केली. भरडधान्यांचे आरोग्यदायी महत्त्व समजल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
टोमणे ऐकले, पण तुषार थांबले नाहीत
2020 मध्ये कोविड-19 महामारी आणि लॉकडाऊनदरम्यान तुषार नाशिकला परतले. याच काळात त्यांनी व्यवसायाची सुरुवात करत व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि इंडिया पोस्टच्या माध्यमातून 5 किलोचे बाजरीचे सेट विकण्यास सुरुवात केली. ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागल्याने त्यांनी महिन्याला अवघ्या 2 हजार रुपयांने भाड्याने 150 चौरस फुटांची खोली घेतली.
मात्र 2021 मध्ये त्यांच्या व्यवसायाची माहिती नातेवाईक आणि कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांना टोमणे ऐकावे लागले. ‘इंजिनिअर असून तू रेशन कसे वाटू शकतोस?’ असे अनेक प्रश्न त्यांना केला जात होता. आईनेही त्यांना नोकरी करण्याचा सल्ला दिला.
तरीही तुषार यांनी हार मानली नाही. कोणतीही आर्थिक मदत न घेता त्यांनी व्यवसायातून मिळणारा पैसा पुन्हा व्यवसायातच गुंतवला. पुढे ते 1,500 चौरस फुटांच्या घरात राहू लागले आणि कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगच्या माध्यमातून नूडल्स, पीठ, कुकीज यांसह तब्बल 50 ते 60 उत्पादने बाजारात आणली. नातेवाईकांचे टोमणे आणि आर्थिक अडचणी असूनही त्यांनी व्यवसायाचा विस्तार सुरूच ठेवला.
बाजारातील उणीव ओळखली अन् तयार केला अनोखा खाखरा
व्यवसाय वाढवत असताना तुषार यांना बाजारपेठेतील एक महत्त्वाची उणीव जाणवली. दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित ‘आहार’ आणि ‘वर्ल्ड फूड इंडिया’ यांसारख्या प्रदर्शनांना भेट दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, बाजरीपासून बनवलेल्या खाखऱ्यांचे बाजारात फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. बाजरीमध्ये चिकटपणा कमी असल्याने मशीनमध्ये खाखरे तयार करताना ते तुटत होते.
ही अडचण दूर करण्यासाठी तुषार यांनी जवळपास सहा महिने विविध प्रयोग आणि चाचण्या केल्या. अखेर त्यांनी बाजरी आणि गव्हाचे 50:50 प्रमाणातील अनोखे मिश्रण विकसित केले. या सूत्रामुळे कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर न करता कुरकुरीत आणि टिकाऊ खाखरे तयार करणे शक्य झाले.
या प्रयोगाला पुढे व्यवसायाचे स्वरूप देत 2024 मध्ये पीएमएफएमई (PMFME) योजनेअंतर्गत मिळालेल्या 10 लाख रुपयांच्या अनुदानासह कौटुंबिक गुंतवणुकीच्या मदतीने तुषार यांनी नाशिक-मुंबई महामार्गावर 5000 चौरस फुटांचे स्वतःचे उत्पादन युनिट उभारले. विशेष म्हणजे या प्लांटचे कामकाज 8 ते 10 महिलांची टीम सांभाळते.
आता कोट्यवधींची उलाढाल; व्यवसायाने घेतली मोठी झेप
तुषार यांनी उत्पादनांची गुणवत्ता आणि आरोग्यदायीपणा टिकवून ठेवण्यावर सुरुवातीपासूनच भर दिला. कंपनीच्या उत्पादनांमध्ये पाम तेल, पांढरे मीठ आणि पांढरी साखर वापरली जात नाही. त्याऐवजी राइस ब्रॅन ऑइल, सैंधव मीठ, खडीसाखर आणि मेघालयातील प्रसिद्ध लकाडोंग हळद यांसारख्या पर्यायांचा वापर केला जातो.
व्यवसायाच्या सुरुवातीला तुषार यांनी B2B ग्राहकांना उत्पादनांचे मोफत नमुने देऊन त्यांचा विश्वास मिळवला. हळूहळू काही प्रमुख सेंद्रिय ब्रँड्स त्यांच्या कंपनीचे ग्राहक बनले. आज हे ग्राहक एका वेळी 1 हजार ते 1,500 पॅकेट्सची ऑर्डर देतात.
सध्या कंपनीकडे 100 हून अधिक प्रकारचे खाखरे आणि 200 हून अधिक भरडधान्यांवर आधारित उत्पादने आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीने 2.5 कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य ठेवले आहे. यापुढे B2C बाजारात प्रवेश करून आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत 4 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे तुषार यांचे उद्दिष्ट आहे.
टोमण्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता कोट्यवधींच्या व्यवसायापर्यंत पोहोचला आहे.
