Union Budget 2026: 15 मिनिटात सरकारच्या 5 मोठ्या घोषणा, सेमीकंडक्टर ते केमिकल क्लस्टर, काय काय गिफ्ट?
Union Budget 2026: कोणतीही मोठी निवडणूक टप्प्यात नसताना केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 15 मिनिटात सरकारच्या 5 मोठ्या घोषणा केल्या, काय काय मिळालं देशवासियांना गिफ्ट?

Budget 2026: लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली आहे. पहिल्या 15 मिनिटातच हा अर्थसंकल्प वेगळ्या धाटणीचा असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकार आता देशातील विविध भागात पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच जागतिक स्तरावर देशाला पुढे आणण्यासाठी एक व्हिजन घेऊन उतरल्याचे दिसून आले. निर्मला सीतारमण या अर्थमंत्री म्हणून नवव्या वेळा अर्थसंकल्प (Budget 2026-27) सादर करत आहेत. त्यांनी दावा केला की सरकारच्या दमदार पावलांमुळे देशात 7 टक्के विकास दरासह गरिबी कमी करण्यात मोठे यश आले आहे. 2025 मध्ये 350 हून अधिक सुधारणा केल्याचा दावा सरकारने केला आहे.
अवघ्या 15 मिनिटात 5 दमदार घोषणा
देशभरात मेगा टेक्सटाईल पार्क
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशात मेगा टेक्सटाईल पार्क तयार करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय फायबर योजना, मनुष्यनिर्मित फायबर, अत्याधुनिक फायबर, राष्ट्रीय हातमाग योजनेतून अगोदरच कारागिरांना मोठी मदत मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. तर आता कौशल्य सुधारणेसाठी प्रशिक्षणावरही भर देण्यात येणार आहे.
देशात 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर
यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वात मोठी घोषणा केली. त्यांनी देशातंर्गत 7 नवीन गतीशील रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा केली. मुंबई-पुणे, पुणे-मुंबई, दिल्ली ते वाराणसी-वाराणसी ते सिलीगुडी आणि बेंगळुरू ते चेन्नई आणि चेन्नई ते बेंगळुरू असे हे हायस्पीड कॉरिडॉर असतील.
वाराणसी आणि पाटण्यात जहाज दुरुस्ती केंद्र
बजेटमध्ये यावेळी वाराणसी आणि बिहारमधील पाटण्यात जहाज दुरुस्ती केंद्रसाठी इकोसिस्टिम तयार करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. रेअर अर्थ मटेरिअलसाठी ओडिसा, तामिळनाडू, आंध्रप्रदेशात खास प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी दुर्मिळ घटकांसाठी खास मिनरल पार्क तयार करण्यात येणार आहे.
कॅपिटल एक्सपेंडिचर 12.20 लाख कोटी
निर्मला सीतारमण यांनी कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवले. त्यासाठी 12.20 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी 40 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे.
या 6 क्षेत्रावर सरकारचे लक्ष
तर देशातील उत्पादन, धोरण, सीमावर्ती क्षेत्र, आरोग्यसेवा, तंत्रज्ञानासह सहा क्षेत्रात अमुलाग्र बदलाचे धोरण अवलंबिले आहे. त्यासाठी हस्तक्षेप प्रस्ताव सादर केला आहे.
