थरार.. धावत्या ट्रेनमध्ये तरुणांच्या टोळक्याचा हल्ला, लाथा बुक्क्यांचा मारा, पब्लिक ओरडत होती… कल्याणमघ्ये उतरताच…

| Updated on: Jan 13, 2024 | 9:06 AM

ऑफीसमध्ये दिवसभर काम करून पिट्ट्या पडलेले चाकरमानी, तुडुंब भरलेल्या लोकलमधून वाट काढत, कसाबसा प्रवास करत घराच्या दिशेने निघाले. कल्याण स्टेशनला जेवढी लोक खाली उतरतात, त्याहून तिप्पट वर चढण्याच्या घाईत असतात. प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवायला जागा नसते पण तेवढ्यात जोरजोरात भांडणाचा आवाज येऊ लागतो

थरार.. धावत्या ट्रेनमध्ये तरुणांच्या टोळक्याचा हल्ला, लाथा बुक्क्यांचा मारा, पब्लिक ओरडत होती... कल्याणमघ्ये उतरताच...
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 13 जानेवारी 2024 :  स्थळ – कल्याण रेल्वे स्टेशन, वेळ – रात्री नऊची… (अर्थात तूफान गर्दीची)… ऑफीसमध्ये दिवसभर काम करून पिट्ट्या पडलेले चाकरमानी, तुडुंब भरलेल्या लोकलमधून वाट काढत, कसाबसा प्रवास करत घराच्या दिशेने निघाले. कल्याण स्टेशनला जेवढी लोक खाली उतरतात, त्याहून तिप्पट वर चढण्याच्या घाईत असतात. प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवायला जागा नसते पण तेवढ्यात जोरजोरात भांडणाचा आवाज येऊ लागतो…. बघ्यांची गर्दी जमू लागते. जोरात भांडणं, एकमेकांचा उद्धार असे वादाचे स्वरूप.. पण बघता बघता तो वाद वाढला आणि समोरच्या तरूणाला दोघांनी थेट बेदम मारायलाच सुरूवात केली.

एकटा तरूण वि. ते दोघे अशी त्यांची लढाई सुरू होती. कारण काय तर त्या तरूणाने लोकलमध्ये मोबाईल चोरला, असा त्या तरूणांचा आरोप. काय खोटं, काय खरं हे न पाहता, शहानिशा न करताच त्या दोघांनी कायदा हातात घेत, त्या तरूणाला मारहाण सुरू केली. वरतून शिव्यागाळ, शाब्दिक मारही सुरूच होता.

हा सीन पाहून कोणालाही संजय दत्तच्या मुन्नाभाई एम.बी.बी.एस चित्रपटातील त्या स्टेशनच्या सीनची आठवण येईल. त्यात सुनील दत्त हे त्यांच्या कोटाच्या खिशातील पाकिट मारणाऱ्या त्या चोराला पकडतात आणि उर्वरित पब्लिक त्याच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतं, कोणी मारायचाही प्रयत्न करतं. तसाच काहीसा सीन काल मध्य रेल्वेच्या स्टेशनवरही घडला. रात्री ९ च्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर प्रवाशांचा मोठा गोंधळ होता.

नेमकं झालं तरी काय ?

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण रेल्वे स्टेशनला नुकताच सर्वात स्वच्छ स्टेशनचा पुरस्कार मिळाला आहे. यामुळे कल्याणवासीय खुश आहेत. मात्र आता याच कल्याण स्टेशनवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर रात्री नऊच्या सुमारास प्रवाशांचा मोठा गोंधळ झाला. मात्र हा गोंधळ चोरामुळे नव्हे तर चोरीच्या आरोपामुळे झाला.

एका तरूणाने मोबाईल चोरल्याचा आरोप करत दोन तरूणांनी त्याला धावत्या ट्रेनमध्येच बेदम मारहाण केली. त्याला अक्षरश:धुतले. मात्र ही बेरेहम मारहाण पाहून प्रवासीही संतपाले. त्या तरूणाला स्वत: मारू नका, कायदा हातात घेऊ नका. तो खराच चोर असेल तर त्याला सरळ पोलिसांच्या ताब्यात द्या, असे सर्व प्रवासी त्या तरूणांना सांगत होते. मात्र त्या तरूणांवर राग एवढा स्वार झाला होता की त्यांना चांगल-वाईट कशाचीच समज नव्हती. मोबाईल चोरणाऱ्या त्या तरूणाला त्यांनी यथेच्छ बडवलेच पण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांनाही त्यांनी शिवीगाळ केली.

मारहाण करणाऱ्या तरूणांनी काढला पळ

मग काय ट्रेनने प्रवास करणारे सर्वच प्रवाशांनी गोंधळ घालणाऱ्या त्या दोन तरुणांना डब्यातून बाहेर काढले आणइ कल्याण स्टेशनवर उतरवले. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर बराच काळ गोंधळ सुरू होता. या घटनेची माहिती रेल्वे, आरपीएफ पोलिसांना मिळाल्यावर ते लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संतप्त प्रवाशांना शांत केले. मात्र तोपर्यंत त्या मारहाण करणाऱ्या तरूणांनी संधी साधली आणि ते गुपचून तिथून सटकले. रेल्वे पोलिसांनी चोरीचा आरोप असलेल्या आणि मारहाण झालेल्या त्या तरुणाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे