आधी कार ठोकली, चालक उतरल्यावर डोळ्यात मिरचीपूड टाकून 80 लाखांचे दागिने पळवले
चोरट्यांनी सराफाची लूटमार करत त्याच्याकडील लाखो रुपयांचे दागिने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सराफाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि सुमारे 80 लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग हिसकावून पळ काढला.
नागपूर | 5 डिसेंबर 2023 : नागपूरमध्ये सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून वाढत्या गुन्ह्यांमुळे नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांची वाढती गस्त, कडक बंदोबस्त असूनही गुन्हेगार मोकाट सुटले असून गुन्हे रोखण्यात फारसं यश मिळत नाही. त्यातच आता टाकळघाट येथे चोरट्यांनी सराफाची लूटमार करत त्याच्याकडील लाखो रुपयांचे दागिने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सराफाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि सुमारे 80 लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग हिसकावून पळ काढला.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट-खापरी मार्गावरील शनिवारी रात्रीच्या सुमारास लुटीची ही घटना घडली आहे. लाखोंचे दागिने चोरीला गेल्याने फिर्यादी सराफा व्यावसायिक अतुल रामकृष्ण हादरले. या लुटीप्रकरणी सराफा व्यावसायिक बुटीबोरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोधही सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सराफा व्यावसायिक अतुल रामकृष्ण यांचं टाकळघाट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र समोर रामशिव पॅलेसमध्ये ज्वेलर्सचे दुतकान आहे. गेल्या १०- १५ वर्षांपासून हे दुकान सुरू असून, या वर्दळीच्या रस्त्यावर नेहमी गजबज असते. शनिवारी नेहमीप्रमाणे रामकृष्ण यांनी रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद केलं आणि ते त्यांच्या कारमध्ये बसूवृन खापरी येथे जाण्यासाठी निघाले.
आधी कार ठोकली, नंतर मिरचीपूड फेकली..
मात्र थोड्याच अंतरावर त्यांच्या कारसमोर एक बाईक येऊन थांबली, त्यांची धडकही झाली. अतुल हे लागलीच कारमधून खाली उतरले आणि बाईकस्वाराला नाव वगैकरे विचारून, लागले नाही ना, याची विचारपूस केली. मात्र तेवढ्यात त्याच्या दुसऱ्या साथीदाराने लाल मिरचीपूड काढली आणि अतुल यांच्या डोळ्यात फेकली. तसेच त्यांना जोरदार धक्का देऊन खाली पाडलं. त्यानंतर दोन्ही तरूणांनी अतुल यांच्या कारमधील सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग आणि रोख रक्कमही उचलली आणि ते लागलीच बाईकवरून फरार झाले.
त्या दोघांनी दागिने आणि पैसे लुटल्याचे लक्षात येताच अतुल यांनी कारमधून त्यांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. मात्र मिरचीपूड फेकल्याने त्यांचे डोळे आधीच झोंबत होते, त्यामुळे कार चालवताना त्यांचे नियंत्रण सुटले आणि ती नाल्यात पलटली. या अपघातात अतुल किरकोळ जखमी झाले आणि चोरांनी पळ काढला.
यानंतर अतुल यांनी बुटीबोरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि फिर्याद नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. मात्र शनिवारी ही चोरीची घटना घडली, आता दोन दिवस उलटून गेल्यानंतरही चोरांचा काहीच शोध लागलेला नसल्याने नागरिक संतापले आहेत. मिरचीपूड फेकून चोरी करणाऱ्या त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.