Osmanabad | ‘आयकर’ची नवीच खेळी, जालन्यात वऱ्हाडी बनले तर उस्मानाबादेत कृषी शिबिरार्थी, धाराशिव साखर कारखान्यावर पहाटेच धाड, टार्गेट कोण?

| Updated on: Aug 25, 2022 | 2:18 PM

जालन्यात कपडा आणि रियल इस्टेट व्यापाऱ्यांवर दोन आठवड्यांपूर्वी छापेमारी झाली. त्यावेळी तर आयकर विभागाने राहुल वेड्स अंजली असे स्टिकर्स गाडीवर लावले होते. आयकर विभागाच्या या स्टिकर लावण्याच्या नव्या खेळीची सध्या जोरदार चर्चा आहे.

Osmanabad | आयकरची नवीच खेळी, जालन्यात वऱ्हाडी बनले तर उस्मानाबादेत कृषी शिबिरार्थी, धाराशिव साखर कारखान्यावर पहाटेच धाड, टार्गेट कोण?
उस्मानाबादेत साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

उस्मानाबादः उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव शुगर कारखान्यावर (Dharashiv Sugar Factory) आयकर विभागाची धाड पडली असून आज पहाटे पासून आयकर विभागाच्या (Income tax) अधिकाऱ्यांची कारवाई सुरु आहे. ही कारवाई आगामी काही दिवस सुरु राहील अशी माहिती आहे. विशेष म्हणजे आयकर विभागाच्या गाडीवर कृषी अभ्यास शिबिराचे बोर्ड लावण्यात आले होते. हेच स्टिकर लावलेली गाडी आज पहाटेच धाराशिव साखऱ कारखान्यावर (Osmanabad Raid) पोहोचली. यापूर्वी जालन्यात कपडा आणि रियल इस्टेट व्यापाऱ्यांवर दोन आठवड्यांपूर्वी छापेमारी झाली. त्यावेळी तर आयकर विभागाने राहुल वेड्स अंजली असे स्टिकर्स गाडीवर लावले होते. आयकर विभागाच्या या स्टिकर लावण्याच्या नव्या खेळीची सध्या जोरदार चर्चा आहे.

आयकर विभागाचे टार्गेट कोण?

अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या 10 वर्षात ओळखले जात आहेत. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. विठ्ठल सहकारी व धाराशिव कारखाना चेअरमन आहेत.त्यांच्या ताब्यात 5 कारखाने आहेत त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक व नांदेड येथे एक, धाराशिव असे साखर कारखाने आहेत.

वाळू माफिया ते साखर सम्राट.. 3 महिने तुरुंगवारी

वाळू माफिया ते साखर सम्राट असा अभिजीत पाटील यांचा प्रवास आहे, त्यांना तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर वाळू तस्करी प्रकरणात जवळपास 3 महिने जेलवारी पण झाली होती त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर ट्रॅक बदलला व साखर कारखानदारी सुरु केली.

कृषी अभ्यास शिबिराचे बोर्ड…

आज गुरुवारी पहाटेच  कृषी अभ्यास शिबीर 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट असा बोर्ड लावून आयकर विभागाची गाडी धाराशिव साखर कारखाना येथे धाड टाकण्यासाठी आली आहे.. या गाडीवर लागलेल्या बोर्डनुसार 30 ऑगस्टपर्यंत हा आयकर विभागाचा अभ्यास दौरा सुरु राहणार आहे. 5 गाड्यात जवळपास 20 च्या वर अधिकारी हे पाटील यांच्या विविध संस्थाची चौकशी करीत आहेत. यात पुणे व दिल्ली येथील काही अधिकारी यांचा समावेश आहे. जालना येथे आयकर विभागाचे अधिकारी यांनी राहुल वेड्स अंजली असे स्टिकर गाडीला लावून धाड टाकण्यासाठी आले होते… आता उस्मानाबाद येथे कृषी अभ्यास शिबिराचा फंडा वापरला असल्याचे दिसते.