Sangli Crime : 2 टोळ्या 1 वर्षासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापुरातून तडीपार! सांगली ग्रामीण पोलीस अधिक्षकांचा आदेश

उमेश घोलप आणि ओंकार भोरे असे दोघेही कायदा जुमानत नसल्यामुळे त्यांना तडीपार केलं जावं, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस कायदा कलम 55 नुसार ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

Sangli Crime : 2 टोळ्या 1 वर्षासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापुरातून तडीपार! सांगली ग्रामीण पोलीस अधिक्षकांचा आदेश
तडीपार केलेले गुंड
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 25, 2022 | 12:49 PM

सांगली : सांगलीमधील (Sangli crime news) दोन टोळ्या एका वर्षासाठी तडीपार करण्यात आल्या आहेत. उमेश कोलप (Umesh Kolap) आणि अमोल कुच्चीकोरवी (Amol Kuchchikoravi) यांच्या टोळींना तडीपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांनी याबाबतचे आदेश दिली आहेत. सांगली पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या आदेशानुसार, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार उमेश कोलप टोळी आणि विश्रामबाग हद्दीतील गुन्हेगार अमोल कुच्चीकोरवी या दोन टोळीला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलंय. त्यामुळे सांगलीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास आता व्यक्त केला जातोय. फक्त सांगली नव्हे तर सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांमधूनही या दोन्ही टोळीतल्या गुंडांना तडीपार करण्यात आलंय.

कोण आहे उमेश घोलप?

ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील टोळीप्रमुख उमेश घोलप (वय 24 राहणार अंकली) तर ओंकार चंद्रकांत भोरे (वय 21 राहणार अकली) यांच्याविरुद्ध 2015 ते 22 या काळात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात कुंटणखाना चालवणे, मुलींची छेड काढणे, अल्पवयीन मुलीस पळवून नेणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दुखापत करून जबरी चोरी, अनधीकृतपणे घरात घुसून मारहाण करणे, सरकारी नोकरावर हल्ला करून दहशतवाद माजवणे, गर्दी मारामारी असे गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.

उमेश घोलप आणि ओंकार भोरे असे दोघेही कायदा जुमानत नसल्यामुळे त्यांना तडीपार केलं जावं, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस कायदा कलम 55 नुसार ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. दोघांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दीक्षित गेडाम यांनी दिला आहे.

कोण आहे कुच्चीकोरवी गँग?

विश्रामबाग हद्दीतील टोळीप्रमुख अमोल गंगाप्पा कुच्चीकोरवी आणि अमोल जगन्नाथ सरगर, विनोद रामचंद्र मोहिते या टोळीविरुद्ध 2016 ते 21 या काळात अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवण्यात आलेत. यात हत्येचा प्रयत्न, घातक हत्यारने हल्ला करणे, गर्दी, मारामारी, संघटीत गुन्हे असे तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्धही विश्रामबाग पोलिसांनी तडीपारचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक गेडाम यांना पाठवला होता. गेडाम यांनी तिघांना सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसणार आहे.