SSC Result 2025 Date : बारावीनंतर दहावीचा निकाल कधी? संभाव्य तारखा समोर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, ५ मे २०२५ रोजी, इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण उत्तीर्णता दर ९१.८८% आहे. कोकण विभाग सर्वाधिक उत्तीर्णतेचा दर (९६.७४%) नोंदवून अव्वल ठरला आहे. मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून, दहावीचा निकाल १५ ते २० मे दरम्यान अपेक्षित आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (५ मे २०२५) जाहीर झाला. महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण निकाल ९१.८८ टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत घट झाली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. विभागीय मंडळातून कोकण विभागानं बाजी मारली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
यंदा दहावी आणि बारावी दोन्हीही परीक्षा १० ते १२ दिवस लवकर झाल्या होत्या. त्यानुसार निकालही लवकर जाहीर होत आहेत. यंदा दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात पार पडली होती. या परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली. आता सध्या उत्तरपत्रिकांमध्ये कोणता प्रश्न तपासायचा राहिला आहे का?, उत्तरपत्रिकेवरील गुण आणि गुणपत्रिकेवर घेतलेले गुण बरोबर आहेत का?, याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे. या पडताळणीनंतर गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली होती.
दहावीचे विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत
बारावीचा निकाल आज जाहीर झाला असला तरी दहावीचे विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १५ ते २० मे पर्यंत जाहीर होऊ शकतो, असे म्हटलं जात आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर तो मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
कोकण विभागीय मंडळाने मारली बाजी
दरम्यान यंदाच्या बारावी परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला. नेहमीप्रमाणे यंदाही 9 विभागांच्या निकालात कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक 96.74 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. त्यात लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी 89.46 टक्के निकाल लागला आहे.