मोठा ट्विस्ट | अमरावतीची जागा शिंदे गटाला नाहीच, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; नवनीत राणा यांचं काय?

| Updated on: Mar 20, 2024 | 6:00 PM

लोकसभा निवडणुकीचे नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरणे सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात अमरावतीतूनही अर्ज भरला जाणार आहे. मात्र, अमरावतीची जागा भाजपने स्वत:कडे घेतल्याने शिंदे गटाची चांगलीच गोची झाली आहे. भाजपने ही जागा आपल्याकडे घेतल्यानंतर या जागेवरून नवनीत राणा लढणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मोठा ट्विस्ट | अमरावतीची जागा शिंदे गटाला नाहीच, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; नवनीत राणा यांचं काय?
navneet rana
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अकोला | 20 मार्च 2024 : अमरावती लोकसभा निवडणुकीवरून शिंदे गट आणि अपक्ष आमदार नवनीत राणा यांच्यातील रस्सीखेच सुरू असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबतचं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाची मोठी गोची झाली आहे. फडणवीस यांनी अमरावतीची जागा भाजपच लढणार असल्याचं थेट स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाने महायुतीत ही जागा गमावल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजप ही जागा लढणार असल्याने आता आनंदराव अडसूळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, नवनीत राणा यांचं काय होणार? याची उत्सुकताही ताणली गेली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही मोठी माहिती दिली. अमरावती लोकसभेची जागा भाजप लढेल. जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा तिथल्या विद्यमान खासदार आहे. नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भाजप सोबत राहिल्या आहेत. पाच वर्षे त्यांनी लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजप आणि मोदींची बाजू मांडली आहे. शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंट्री बोर्ड आणि निवडणूक कमिटी घेईल. त्याबद्दल यापेक्षा अधिक काहीही सांगू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्या या विधानामुळे अमरावतीची जागा शिंदे गटाकडे राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, नवनीत राणा यांना भाजपमध्ये प्रवेश केला तरच तिकीट मिळू शकतं, असं फडणवीस यांच्या विधानातून अधोरेखित झाल्याने नवनीत राणाही काय राजकीय निर्णय घेतात याकडेही सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

शिवसेनेला काम करायचं आहे

यावेळी त्यांना आनंदराव अडसूळ यांच्याबाबत विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी ठाम प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी भाजपला जागा सुटेल, त्या ठिकाणी शिवसेनेने काम करायचं आहे. जिथे शिवसेनेला जागा सुटेल, तिथे आम्ही त्यांचे काम करायचं आहे. जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी काम करायचं आहे, असं सांगत फडणवीस यांनी आडसूळ यांच्या राजकीय भवितव्यावर बोलणं टाळलं.

नाराजी दूर करू

यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हर्षवर्धन पाटील यांची नाराजी नव्हती. त्यांचे काही प्रश्न होते. त्यांचे प्रश्न सोडवण्याचं मी आश्वासन दिलं आहे. हर्षवर्धन पाटील जेव्हापासून भाजपमध्ये आले, तेव्हापासून सातत्याने त्यांनी भाजप मोठा करण्याचा प्रयत्न केला आहे. समर्पित भावनेने ते काम करत आहेत. पूर्ण ताकदीने हर्षवर्धन पाटील महायुतीच्या उमेदवाराचे काम करतील. मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचा उमेदवार असेल तिथे सोबत काम केलं पाहिजे. कुठे काही नाराजी असेल तर दूर करू, असंही ते म्हणाले.

माझी काही प्रतिमा ठेवा

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही त्यांनी फटकारलं. संजय राऊत कोण आहेत? संजय राऊत यांच्या सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता, माझी तर काही प्रतिमा ठेवा, असंही ते म्हणाले.