महायुतीत पाच जागांचा तिढा अजून कायम, शिरसाट यांची कबुली?; कोणत्या आहेत जागा?

| Updated on: Apr 06, 2024 | 6:37 PM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीने बैठक बोलावली. वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. एकदिलाने काम करा. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत सोबत ठेवा आणि महायुतीच्या घटक पक्षाच्या उमेदवारालाही साथ द्या, अशा सूचनाच मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महायुतीत पाच जागांचा तिढा अजून कायम, शिरसाट यांची कबुली?; कोणत्या आहेत जागा?
sanjay shirsat
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महायुतीतील जागा वाटपांचा पेच अजून सुटलेला नाही. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीच याबाबतची कबुली दिली आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि संभाजीनगर या महत्त्वाच्या पाच जागांबाबत आम्ही आग्रही आहोत. आज उद्या या जागांचा तिढा सुटेल, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या पाचही जागा शिवसेनेच्याच आहेत. या जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत, असं असतानाही भाजप आणि अजितदादा गटाने या जागांवर दावा सांगितल्याने शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षावर बैठक बोलावली होती. या बैठकीला संजय शिरसाट उपस्थित होते. या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली. नाशिक, संभाजीनगर, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग आदी जागांवर आम्ही आग्रही आहोत. यावर आज किंवा उद्या तोडगा निघेल, असं संजय शिरसाट म्हणाले. शिवसेनेच्या एकदोन मतदारसंघाबाबत तडजोड झाली आहे. पण इतर मतदारसंघावरही लक्ष केंद्रीत केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणूक अटीतटीची

इतर पक्षाचे लोकं शिवसेनेच्या मतदारसंघावर दावा करत आहेत. त्या मतदारसंघाबाबत आजच्या बैठकीत आमदारांनी आग्रही भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत, ते सांगतील तो आदेश आम्ही पाळू. आजच्या बैठकीत तिन्ही पक्षांनी मिळून काम करण्यावर सखोल चर्चा केली. आपला उमेदवार असेल तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत कसे असले पाहिजे, यावर चर्चा झाली. एकमेकांच्या मतदारसंघात एकमेकांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला. अटीतटीची निवडणूक आहे. मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे. त्यामुळे एकदिलाने सर्वच मतदारसंघात काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

एकमेकांविरोधात बोलू नका

संपर्कात अडचणी येत असेल तर एक डिव्हीजन तयार केली आहे. तिन्ही पक्षाचे एक एक प्रतिनिधी या डिव्हिजनमध्ये असतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कसा संपर्क साधायचा यावरही चर्चा करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं. आघाडी आणि महायुतीच्या राजकारणात थोडी बहुत कुरबुरी असते. काही ठिकाणी कार्यकर्ते स्लो जात असतात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या बैठकीत आमदारांच्या सर्व तक्रारी मांडणार असल्याचं सांगितलं. सध्या एकमेकांविरोधात कुणी बोलू नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.