Uttar pradesh assembly election 2022: उत्तर प्रदेशात भीम आर्मीची ‘आझाद’ खेळी, उमेदवारांची यादी जाहीर; कोंडी कुणाची? सपा की बसपाची? वाचा सविस्तर

समाजवादी पार्टीने आघाडी करण्यास नकार दिल्यानंतर भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आझाद समाज पार्टीच्या आज उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली.

Uttar pradesh assembly election 2022: उत्तर प्रदेशात भीम आर्मीची आझाद खेळी, उमेदवारांची यादी जाहीर; कोंडी कुणाची? सपा की बसपाची? वाचा सविस्तर
Chandrashekhar Azad
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 6:46 PM

लखनऊ: समाजवादी पार्टीने आघाडी करण्यास नकार दिल्यानंतर भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आझाद समाज पार्टीच्या आज उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली. यावेळी त्यांनी सपा नेते अखिलेश यादव यांनी धोकेबाजी केल्याचा आरोप केला. मात्र, भीम आर्मीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका बसपला बसणार की सपाला याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे.

भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी पत्रकार परिषद घेऊन आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आज मी मैदानातून पळ काढला तर उद्या कोणताही तरुण उभा राहू शकणार नाही. हे सर्व नेते सत्तेचे भुकेले आहेत. आमच्याशी धोका झाला. आम्हाला मूर्ख बनवलं म्हणून काही लोक हसत असतील. पण आमचं ध्येय सत्ता मिळवणं कधीच नव्हतं. आमचं ध्येय सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचं आहे, असं चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं.

काँग्रेससोबत युतीचे संकेत

यावेळी त्यांनी काँग्रेससोबत युती करण्याचे संकेतही दिले. आज संध्याकाळपर्यंत सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं. तसेच पक्षाने ठरवलं तर गोखरपूरमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. आम्हाला यादव यांनी आधी 25 जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं. मला आमदारकी आणि मंत्रीपदाची ऑफर होती. मात्र, मी त्याला नकार दिला, असं सांगतानाच आता समाजवादी पार्टीने 100 जागा दिल्या तरी त्यांच्यासोबत आघाडी करणार नाही. मात्र, भाजपला रोखण्यासाठी निवडणुकीत सर्वच पक्षांना आम्ही मदत करू, असंही त्यांनी सांगितलं. मायावतींसोबतही त्यांनी आघाडीचा प्रयत्न केला होता. मात्र, मायावतींनी काहीच प्रतिसाद दिला नसल्याचं सांगितलं जात आहे.

फोन आला अन् आझाद पलटले

चंद्रशेखर आझाद दोनदा अखिलेश यादव यांना भेटले होते. दोघांमध्ये आघाडीवर चर्चाही झाली होती. मात्र, आघाडीचा निर्णय होऊ शकला नाही. अखिलेश यांना दलितांची मते हवीत, पण त्यांना दलित नेते नको आहेत, असा आरोप चंद्रशेखर आझाद यांनी केला होता. तर आघाडीत भीम आर्मीला दोन जागा देण्यात येत होत्या. त्यावर चंद्रशेखर तयारही झाले होते. मात्र, त्याचवेळी त्यांना कुणाचा तरी फोन आला. त्यानंतर त्यांनी निर्णय बदलला, असं सांगतानाच या मागे काही तरी षडयंत्रं आहे, असा पलटवार अखिलेश यादव यांनी केला आहे.

सपाची कोंडी होणार?

दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आधी चंद्रशेखर आझाद यांच्यामुळे बसपाला निवडणुकीत नुकसान होणार असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच बसपाची मते खेचून आणण्यात आझाद यशस्वी होऊ शकतात असंही सांगितलं जात होतं. मात्र, सपाने आझाद यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने भीम आर्मीचा निवडणुकीतील टीकेचा रोख जेवढा भाजपवर राहील तेवढाच तो समाजवादी पार्टीवरही राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बसपाला जितकं नुकसान होणं अपेक्षित होतं तेवढं होणार नाही, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

 

संबंधित बातम्या:

Uttar pradesh assembly election 2022: फॉर्ममध्ये नाव लिहा, 300 यूनिट वीज मोफत घ्या; सपाच्या ऑफरने भाजप, बसपाची कोंडी?

यूपी विधानसभा 2022: असदुद्दीन ओवेसी बिघडवू शकतात अखिलेश यादवांचा खेळ

Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली