छत्रपती शिवाजी महाराजांचे खरं चित्र भारतात परत आणायला हवं; मिलिंद गवळीची पोस्ट व्हायरल

सोशल मीडियावर मिलिंद गवळी यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, 'छत्रपती शिवाजी महाराजांचे खरं चित्र भारतात परत आणायला हवं' असे म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे खरं चित्र भारतात परत आणायला हवं; मिलिंद गवळीची पोस्ट व्हायरल
Milind Gawali
Image Credit source: Milind Gawali Instagram
| Updated on: Mar 27, 2025 | 4:23 PM

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेता म्हणून मिलिंद गवळी ओळखले जातात. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. ते सतत कोणत्या ना कोणत्या विषयावर मत मांडताना दिसतात. आता त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे खरं चित्र भारतात परत आणायला हवे’ असे म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, “माझं बालपण डिलाईल रोडला गेलं. लोअर परेल, डिलाईल रोड, लालबाग परळ हा सगळा मिल कामगारांचा एरिया, या भागामध्ये असंख्य ब्रिटिशांनी बांधलेल्या कापसाच्या गिरण्या होत्या. गावा खेड्यातून, कोकणातून माणसं या मिलमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आली. ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी बीडीडी चाळी बांधल्या. काळ्या दगडाच्या भक्कम चाळी, पण एकेक दीड दीड खोल्यांच्या. कबुतरांच्या खोपट्यां सारखी, अनेक पिढ्या त्या खोपट्यांमध्ये वाढल्या. आपल्या सगळ्यांना त्या खोपट्यांमध्ये राहायची इतकी सवय झाली की ब्रिटिशांना जाऊन 78 वर्षे झाली तरी सुद्धा आपण त्याच पद्धतीची घर बांधतो आणि त्याच खोपट्यांमध्ये राहतो. फक्त एखाद बेडरूम वाढलं.” असे कॅप्शन दिले.

वाचा: अथिया शेट्टीने दाखवली लेकीची झलक? फोटोची सोशल मीडियावर चर्चा

पुढे ते म्हणाले, “माझे वडील मुंबई पोलीस खात्यात होते म्हणून माझं बालपण डिलाईल रोडला ब्रिटिशांच्या कॉर्टरस मध्ये गेलं. साडेतीन हजार स्क्वेअर फिटचं घर होतं ते. कदाचित म्हणूनच आता मला मुंबईच्या या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात, छोट्या छोट्या घरात घुसमटल्यासारखं होतं. कदाचित म्हणूनच श्वास घ्यायला निसर्गात जास्त रमतो. पर्वा २५ वर्षांनी मी आणि दिपा जिजामाता उद्यानात फिरायला गेलो. मुंबईतली ८०% झाडाची वनस्पती या राणीच्या बागेत आहे. तिथे असंख्य प्राणी आहेत पण मला पिंजऱ्यात डाम्बून ठेवलेल्या प्राण्यांमध्ये रस नसतो. तिथे एका गोष्टीने माझं लक्ष वेधलं, ते म्हणजे तिथल्या भव्य दिव्य पुतळ्यांनी. एक बाल शिवाजी आणि जिजामाता यांचा सुंदर पुतळा पण आहे. त्याचबरोबर असंख्य ब्रिटिशांचे पुतळे आहे. जे आपल्या कोणालाच इन्स्पायर करत नाहीत. ब्रिटनचे प्रधानमंत्री कृषी सनक यांच्याशी बोलून ते ब्रिटनला पाठवून द्यायला काहीच हरकत नाही. त्याच्या बदल्यात भारतातू लुटून नेलेल्या असंख्य वस्तू त्यांच्याकडे आहेत. ते परत आणता येतील. मी असा ऐकलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे original painting ब्रिटनमध्ये आहे. ते तर परत आणणे गरजेचंच आहे.”