‘मराठी माणसाला आधी मेहनत करायला शिकवा’ असे म्हणणाऱ्या अभिनेत्रीची जिरवली, मागितली माफी

अभिनेत्रीने आधी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर तिच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्यानंतर माफी मागितली आहे. माफी मागतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मराठी माणसाला आधी मेहनत करायला शिकवा असे म्हणणाऱ्या अभिनेत्रीची जिरवली, मागितली माफी
Rajshree More
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 06, 2025 | 12:34 PM

त्रिभाषा धोरणावरून राज्यात बराच गदारोळ झाला होता. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध झाला होता. त्रिभाषा सूत्रीत हिंदी भाषाच्या सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन विजयी मेळावा घेतला. दरम्यान, एका अभिनेत्रीने ‘मराठी माणसाला आधी मेहनत करायला शिकवा’ असे म्हटले होते. त्यानंतर आता या अभिनेत्रीने सर्वांची माफी मागितली आहे.

नेमकं प्रकरण काय?

वर्सोव्यात राहणारी मराठी अभिनेत्री राजश्री मोरे हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या व्हिडिओमध्ये तिने मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. मराठी माणसांमध्ये मेहनत करण्याची क्षमता नाही आणि परप्रांतीय लोक मुंबईतून निघून गेले तर मराठी माणसाची अवस्था बिकट होईल, असे अपमानास्पद शब्द तिने वापरले.

Video: …तर मराठी लोकांचे चांगलेच हाल होतील; व्यापाऱ्यांच्या सभेत अमराठी महिलेची खुलेआम धमकी

अभिनेत्रीने मागितली माफी

या व्हिडिओला तीव्र विरोध झाला आणि वर्सोवा विधानसभेतील मनसे कार्यकर्त्यांनी थेट ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेत राजश्रीविरोधात तक्रार दाखल केली. या सर्व घडामोडींनंतर राजश्रीला शेवटी सार्वजनिक माफी मागावी लागली. तसेच, तिला हा वादग्रस्त व्हिडिओ डिलिट करण्याचे निर्देशही देण्यात आले.

वादाची पार्श्वभूमी

राज्यभरातून विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. सरकारने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचीही घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचे संपूर्ण राज्यात स्वागत करण्यात आले.

विजयी मेळावा

त्रिभाषा सूत्रीत हिंदी भाषाच्या सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर 5 जुलै रोजी वरळी डोम येथे विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जवळपास 18 वर्षांनी एकत्र आले आहेत. अनेकांची कित्येव वर्षांपासून त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे.