चूक मान्य करणं..; अमिताभ बच्चन यांची पोस्ट अन् तुटून पडले नेटकरी, जया बच्चन यांच्याशी लग्नावरूनही घेरलं
अमिताभ बच्चन यांनी बुधवारी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी जया बच्चन यांच्याशी लग्नावरूनही बिग बींना ट्रोल केलं आहे.

बॉलिवूडचे ‘शहनशाह’ अर्थात अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर किंवा ब्लॉगमध्ये ते काही ना काही पोस्ट लिहितच असतात. बुधवारी त्यांनी एक्सवर अशीच एक छोटी पोस्ट लिहिली होती. मात्र त्यावरून नेटकऱ्यांमध्ये मोठ्या चर्चांना उधाण आलं. ‘गलती को मान लेना कोई गलत बात नहीं’ (चूक मान्य करणं यात काहीच चुकीचं नाही) अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती. ही पोस्ट अत्यंत छोटी असली तरी नेटकरी त्याचे अनेक अर्थ काढत आहेत. या पोस्टवर अनेकजण बिग बींना ट्रोलसुद्धा करत आहेत. ‘चूक मान्य करण्यात काहीच गैर नाही’ असं म्हणणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. काहींनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीबद्दलच्या त्यांच्या 2012 मधील ट्विटची आठवण करून दिली, तर काहींनी जया बच्चन यांच्यासोबतच्या त्यांच्या लग्नावरही प्रश्न उपस्थित केले.
डिसेंबर 2025 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांचं लग्नाबद्दल काय मत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, “मी त्यांना याबद्दल कधी विचारलं नाही. पण कदाचित ते म्हणतील, ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. अर्थात हे मला ऐकायचं नाहीये.” आता बिग बींनी जी पोस्ट लिहिली आहे, त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना जया बच्चन यांच्यासोबतच्या लग्नाची आठवण करून दिली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवर त्यांनी उघडपणे बोलावं, अशी मागणी करण्यात आली.
अमिताभ बच्चन यांचं ट्विट-
T 5774 – ग़लती को मान लेना कोई ग़लत बात नहीं !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 17, 2026
‘तुम्ही तुमची चूक आता मान्य करा. आजकाल तुम्हाला पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती दिसत नाहीत. विद्यार्थ्यांवर होणारा अत्याचार आणि पेपर लीकच्या समस्या दिसत नाहीत’, असा टोमणा एका युजरने मारला. तर ‘सर जया बच्चन यांच्यासोबतचं तुमचं लग्न हीसुद्धा एक चूकत होती’, असं दुसऱ्याने म्हटलंय. नेटकऱ्यांनी बिग बींच्या ट्विटवर विविध प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीका केली आहे. बिग बी चालू घडामोडींवर किंवा समस्यांवर बोलणं टाळतात, अशी तक्रार अनेकदा नेटकऱ्यांकडून करण्यात येते. यावर अमिताभ बच्चन यांनीसुद्धा कधीच प्रतिक्रिया दिली नाही.
