
जगप्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांच्या एका वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद अजूनही चर्चेत आहे. फिल्म इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे मला 8 वर्षे काम मिळालं नसल्याचं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. रहमान यांच्या या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीतील विविध कलाकारांनी आपली मतं मांडली. काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. या सर्व वादानंतर आता कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांची उपस्थिती पहायला मिळत आहे. कपिल शर्मा शोच्या मंचावर रहमान यांना स्थान दिल्याबद्दल भाजप नेते नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. एक्स अकाऊंटवर त्यांनी याप्रकरणी पोस्ट लिहिली आहे. भारताची अखंडता, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
‘कॉमेडी म्हटलं की नाव येतं कपिल शर्मा यांचं, आणि ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ला देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मात्र ए. आर. रहमान यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे भारत, इतिहास आणि हिंदू समाजाच्या भावनांबाबत अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांना मोठ्या मंचावर स्थान देण्याच्या निर्णयाबाबत आम्ही तीव्र निषेध नोंदवतो. मनोरंजनाचं स्वातंत्र्य मान्य आहे. परंतु जनभावना, हिंदू समाजाच्या भावनांचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मता यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. नेटफ्लिक्स आणि शो निर्मात्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून समाजातील संवेदनशीलतेची दखल घ्यावी. कॉमेडी स्वागतार्ह आहे, पण भारताची अखंडता, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही,’ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
कॉमेडी म्हटलं की नाव येतं कपिल शर्मा यांचं, आणि The Great Indian Kapil Show ला देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मात्र A. R. Rahman यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे भारत, इतिहास आणि हिंदू समाजाच्या भावनांबाबत अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांना…
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 1, 2026
विशेष म्हणजे ज्या एपिसोडचा नितेश राणे यांनी विरोध केला आहे, त्याच एपिसोडमध्ये रहमान त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. कपिलसोबत ‘मेसेज पासिंग’चा खेळ खेळताना ए. आर. रहमान यांनी म्हटलं की, हा खेळ या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे की कशाप्रकारे एखादी गोष्ट एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत पोहोचता-पोहोचता पूर्णपणे बदलून जाते. त्यांनी याला ‘जगाची समस्या’ म्हणत संदेशांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो आणि पसरवला जाऊ शकतो, असं म्हटलंय.
‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रेहमान यांना इंडस्ट्रीतील पक्षपातीपणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी वैयक्तिकरित्या भेदभावाचा सामना केला नाही असं म्हणत अशा गोष्टींना इंडस्ट्रीतील बदलणारे पॉवर स्ट्रक्चर्स हे योगदान देणारे घटक ठरू शकत असल्याचं मत मांडलं होतं. “मला कदाचित याबद्दल कधी कळलंच नाही. कदाचित ते लपवलं गेलं असेल. पण मला यापैकी काहीही जाणवलं नाही. गेल्या आठ वर्षांत इंडस्ट्रीत बरीच सत्तांतरे झाली आहेत. जे लोक सर्जनशील नाहीत, त्यांच्याकडे आता सत्ता आहे. कदाचित ही एक सांप्रदायिक गोष्टदेखील असेल पण ती माझ्यासमोर दिसली नाही. मी कामाच्या शोधात नाही. मला कामाच्या शोधात जायचं नाही. मला काम माझ्याकडे यावं असं वाटतं. मी ज्यासाठी पात्र आहे, ते मला मिळेल”, असं वक्तव्य रेहमान यांनी केलं होतं.